मुंबई : ‘तुला पाहते रे’ मालिका या आठवड्यात निरोप घेणार. गेल्या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये ती चौथी आली होती. सुरूवातीला नायक आणि नंतर खलनायकाची भूमिका साकारून विक्रांत सरंजामेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेचा शेवट काय होणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण आता विक्रांतमध्ये बराच बदल झाला आहे. तो ईशावर मनापासून प्रेम करत आहे. ईशा त्याच्या बाळाची आई बनणार आहे.
ईशा विक्रांतशी हळुवार वागायला लागते. याचा धक्का आईसाहेब आणि जयदीपला बसला. ते तिला तिच्यातल्या राजनंदिनीची आठवण करून देतात. विक्रांतला अचानक ईशाच्या जागी राजनंदिनी दिसायला लागते. त्यात ईशाचे बाबा ईशाला राजनंदिनीबद्दल सगळं माहीत असल्याचं विक्रांतला सांगतात. विक्रांतला धक्का बसतो. ईशा म्हणजे गेल्या जन्मीची राजनंदिनी आहे, यावर विक्रांतचा विश्वास बसतो. आणि एक दिवस तो स्वत:ला संपवून टाकतो. हाच आहे मालिकेचा शेवट. तुला पाहते रे जास्त वेळी टीआरपीमध्ये पहिल्या पाचात राहिलीय. विक्रांतची भूमिकाही लोकप्रिय झाली. सुबोध भावेनं विक्रांतच्या वेगवेगळ्या शेड्स चांगल्याच साकारल्या. काही दिवसांपूर्वी मालिकेचं शूटिंगही संपलं. सगळ्या कलाकारांनी ते सोशल मीडियावर शेअरही केलं होतं.