पळसदेव – उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने उजनी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या उजनी धरणापासून अगदी भिगवणपर्यंत काठावरील गावात कृषीपंपाला वीज पुरवठा करणारे खांब तर काही ठिकाणी रोहित्र देखील पाण्यात असल्याचे चित्र दिसत आहेत. विद्युत वाहक तारा व खांब पाण्यात असल्याने त्यामधून वीज प्रवाह सोडणे धोकादायक आहे. याची जाणीव महावितरण कंपनीला असून देखील अधिकारी व कर्मचारी केवळ आर्थिक लाभापोटी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकरी, मच्छिमार करीत आहेत.
महावितरण अधिकाऱ्यांचा स्वार्थापोटी उजनी काठावरील पुन्हा एका मच्छिमार युवकाला जीव गमवावा लागला आहे. दैनिक “प्रभात’ने पाण्यातील विद्युत वाहक तारा लोंबकळत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याचा पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी महावितरणला नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी (दि. 17) आगोती येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाला विजेचा धक्का लागून जीव गमवावा लागला होता. महावितरण विभागाच्या दळभद्री कारभारामुळे एक कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उजनीत पाणीसाठा अधिक असल्याने कृषी पंप बसवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. उजनी काठावर बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नाईलजास्तव एकाच जागेवर अनेक कृषीपंप बसवावे लागत आहेत. पाण्यातील खांबावरून वीजपुरवठा करावा लागत आहे. मच्छिमारांनी याठिकाणी मासेमारी करू नये, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे पळसदेव सोसायटीचे संचालक महेंद्र काळे यांनी संगितले.
जीव गमावल्यानंतर महावितरणला जाग
मच्छिमाराचा जीव गेल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांना जाग आली आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील उजनी काठावरील घरगुती उपकरणे वापरणाऱ्या परप्रांतीय मच्छिमारांचे आकडे काढून टाकण्याचा प्रताप नक्की केला आहे. उजनी काठावरील भिगवण, कुरकुंभ, डाळज, पळसदेव, भावडी, आगोती, गंगवळण आदी काठावरील गावांत ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना मच्छिमाराने जीव गमावल्यानंतर जाग आली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.