दत्ता घाडगे
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रोहिणीताईंनी संघर्षातून मिळवले यश, मधाला बाजारात मोठी मागणी
कामेरी – चिकाटी आणि जिद्दीने मोठा संघर्ष करीत महिला उद्योजिका रोहिणीताई पाटील यांनी मधमाशी पालनाचा व्यवसाय यशस्वी करीत पाटणसारख्या दर्गम भागात स्वतःचा ब्रॅंड विकसित केला. त्यामुळेच रोहिणीताई पाटील आज ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श बनल्या आहेत. भविष्यातही हा व्यवसाय वाढण्यासाठी त्या प्रयत्नशील असून महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांचे कार्य अविरतपणे सुरू ठेवणार आहेत.
ग्रामीण भागातील मुलीचे लग्न झाल्यानंतर ती उच्चशिक्षित नसेल तर आज एकविसाव्या शतकातही तिच्याकडे चूल आणि मुल याच दोन जबाबदाऱ्या दिल्या जातात. पण काही महिला मात्र सासरी जाऊन आपल्या स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करत समाजापुढे एक आदर्श निर्माण करतात. अशाच संघर्षातून उभी राहत आपले वेगळेपण सिध्द करणाऱ्या महिला उद्योजिका सौ. रोहिणी प्रकाश पाटील (मु. पो. आडूळ ता. पाटण जि.सातारा) यांची कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी आहे. सोनवडे गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनाली यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले.
आडूळ येथील प्रकाश पाटील यांच्याशी त्यांचे लग्न झाले आणि सोनालीच्या त्या रोहिणी झाल्या. त्यांचे पती नोकरीस असल्याने त्यांची दोन एकर शेती स्वतः उत्पादित करायला त्यांनी सुरुवात केली. पण शेतीतून पाहिजे असे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि खादी ग्रामोद्योग कार्यालयाला भेट देऊन मधमाशी पालन व्यवसायाबद्दल माहिती घेऊन तो करण्याचा निर्णय घेतला. त्याचे प्रशिक्षण महाबळेश्वर येथे असल्याने त्यांना ते जमणार नव्हते. म्हणून त्यांनी गावातील महिलांना एकत्र घेऊन या व्यवसायासंदर्भात पाटण येथेच पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
2014 मध्ये मधुगंध महिला बचत गट स्थापन करत या व्यवसायात पर्दापण केले. व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्यांदा गरज होती भांडवल उभे करण्याची. मग त्यांच्यासह गटातील 15 महिलांनी प्रत्येकी पाच हजार रूपये काढून 75 हजार रूपयांच्या भांडवलात मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात पुरुषांना यश मिळत नाही, तुम्ही तर महिला, तुम्हाला हे जमणार नाही म्हणून सुरुवातीला अनेक लोकांनी हिणवले. पण त्या मागे हटल्या नाहीत. रोहिणीताईंना खादी ग्रामोद्योगने पहिल्यांदा पेट्या उपलब्ध करून दिल्या. कोल्हापूरवरून त्यांनी मधमाशांच्या दहा वसाहती आणल्या, त्यात त्यांची फसवणूक झाली. पण तरीही त्यांनी जोमाने काम सुरू ठेवले. आता त्या स्वतःच मधाचे उत्पादन घेतात.
औषधी वनस्पतींच्या सानिध्यात डोंगर क्षेत्रालगत असणाऱ्या वन क्षेत्रात सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत त्यांनी वसाहती ठेवल्या. त्यांची मध काढणी फेब्रुवारीअखेर व एप्रिलअखेर केली. प्रत्येक आठवड्याला एकदा या वसाहती ठेवलेल्या ठिकाणी जायला लागते. कारण मोठे मुंगळे, पाली, सरडे या माशांना उपद्रव देतात. तसेच स्वतः मध काढणे व इतर कामे त्या उत्तम प्रकारे व धाडसाने करतात. योग्य नियोजन करून पहिल्या वर्षी त्यांना 80 किलो मध मिळाला. हा मध “कोयना अँग्रो’कडून भाडे तत्वावर प्रोसेस करून आपला “फॉंरेस्ट हनी’ नावाचा ब्रॅंड विकसित केला. त्यापुढे प्रत्येक वर्षी भांडवल वाढवत व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली.
आता त्यांच्याकडे 50 ते 55 पेट्या (वसाहती) असून आता वर्षाकाठी त्यांना एका पेटीतून सात ते आठ किलो तर काही पेटीतून दहा किलो मध मिळतो. एकूण उत्पन्नाचा विचार केल्यास 400 किलो मध त्यांना मिळतो. नैसर्गिक गुणधर्म व केमिकलविरहीत असल्याने आज त्याच्या मधाला बाजारात मोठी मागणी असून 200 व 500 ग्रॅंमच्या पॅंकिंगमध्ये मध उपलब्ध असून पुणे, मुंबई, दिल्लीसह परदेशातही त्यांच्या मधाला मागणी आहे.
रोहिणीताईनी सुरू केलेल्या या शेतीपूरक व्यवसायामुळे आज त्यांना व त्याच्या गटातील महिला भगिनींना उत्पादनाचे साधन मिळाले असून दिवसेंदिवस त्याची या व्यवसायातील प्रगती सुरुच आहे. आत्तापर्यंत रोहिणीताईंच्या व्यवसायाला देशातील व परदेशातील नागरिकांनी भेटी दिल्या असून त्यांचे कौतुक केले आहे. तर त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थानी त्यांचा गुणगौरव केला असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.