लोणावळा -वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईहून लोणावळ्यात एका मैत्रिणीसह तीन बहिणी शुक्रवारी (दि. 2) लोणावळ्यात आल्या. तुंगार्ली धरणाकाठी थोरल्या बहिणीचा केक कापला आणि दुपारी दीडच्या सुमारास धरणाच्या पाण्यात उतरलेल्या धाकट्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ध्वनी मनिष ठक्कर (वय 18, रा. रामबाग मनुबाई चाळ, पवई, कुर्ला, मुंबई) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या प्रकरणी सुलोनी मनिष ठक्कर (वय 20) हिने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार मृत ध्वनी ठक्कर, तिची मोठी बहीण सुलोनी, दुसरी बहीण काम्या ठक्कर आणि सुलोनी हिची मैत्रीण वैष्णवी अंबाडन अशा चौघी मुंबई येथुन वैष्णवी अंबाडन हिच्या खासगी मोटारीने लोणावळा येथे आल्या होत्या. तिन्ही ठक्कर बहिणींमधील काम्या हिचा काल शुक्रवारी (दि. 2) वाढदिवस होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चौघी वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि केक कापण्यासाठी तुंगार्ली येथील डॅमजवळ गेल्या.
त्या ठिकाणी त्यांनी केक कापला “फोटोग्राफी’ देखील केली. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास त्या चौघीजणी तुंगार्ली डॅमच्या किनाऱ्यावर पाण्यात भिजत आनंद लुटत होत्या.
ध्वनी ठक्कर हिला धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा पाय घसरून ती तुंगार्ली डॅमचे खोल पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी सुलोनी हिने हात तिचे हातात दिला; मात्र हात पाण्यात सटकून ध्वनी ही खोल पाण्यात गेली. त्यावेळी अन्य तिघींनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून अन्य पर्यटकांनी ध्वनी हिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या बाहेर काढून तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.