पुणे – बिबट्या व मानव हा संघर्श दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. डोंगर, जंगले सोडून बिबट्याने आता मानवी वस्तीचा, उसाच्या शेतीचा आसरा घेतला आहे. जंगली शिकारीपेक्षा मानवी वस्तीत कुत्री, शेळ्या, वासरे, कोंबड्या आदी सोपी शिकार मिळत असल्याने बिबट्या याच भागात चटावलेला दिसतो आहे.
मानवी हल्ले कमी होत असले तरी ते होणारच नाहीत असेही नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेली 10-12 वर्षांपासून जिल्ह्याच्या उत्तर भागात विशेषतः जुन्नर, आंबेगाव व शिरूर भागात असलेला बिबट्या आता आपले प्रस्त् दक्षिणेत वाढवत आहे. गेली काही महिन्यांचा अभ्यास केला तर दौंड, पुरंदर व इंदापूर या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत आहे.
कण्हेरी, काटेवाडी परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले
भवानीनगर -काटेवाडी, कण्हेरी भागात बिबट्यासह बछड्यांचा वावर असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या पायांचे ठसे ही आढळले आहेत. तसेच ज्या भागात बिबट्याचा वावर होत असल्याचा अंदाज आहे त्या-त्या भागात सध्या ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत, अशी माहिती पुण्याचे सहायक वनसंरक्षक वैभव भालेरावर यांनी सांगितले. काटेवाडी, कण्हेरी भागात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक कुत्रा मारला गेला असून एका मेंढीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात ती मेंढी जखमी झाली आहे.
याबाबत मंगळवारी (दि. 21) सहायक वनरक्षक वैभव भालेराव, बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे व त्यांचे सहकारी यांनी या भागात फिरून पाहणी केली असता परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बिबट्या एका दिवसात 10 ते 15 किलोमीटर अंतर पार करू शकतो त्यामुळे त्याचा वावर नक्की कुठे आहे हे आपल्याला सांगता येत नाही; परंतु बिबट्या हा वन्य प्राणी असल्याने त्यालाही इतर प्राण्यांप्रमाणे जीवसृष्टीच्या नियमाप्रमाणे या सृष्टीवर जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बिबट्या आला म्हणून परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे.
पूर्व पुरंदरमध्ये बिबट्याची दहशत
भुलेश्वर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे येथील जनता पूर्णपणे भयभीत झालेली आहे. 13 जानेवारीला टेकवडी येथील पोपटराव इंदलकर यांचा मुलगा दुपारी उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेला असता त्याला त्या ठिकाणी अचानक बिबट्या दिसल्याने तो पूर्णपणे घाबरला. तसेच त्याच दिवशी बिबट्याने तेथील 1 मेंढी फस्त केली. त्यानंतर आठवडाभर या भागात बिबट्याची दहशत कायम होती.
18 जानेवारीला माळशिरस येथील सूर्या लॉन्स या ठिकाणी बिबट्या असल्याचे स्थानिक लोकांनी पाहिले. 19 जानेवारीला शिरसाई मंदिर (पिसर्वे रस्ता) या ठिकाणी रामा तांबे हे रात्री गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर चाल केली. आपला जीव वाचवत बंडगर यांनी तेथून पळ काढला. त्याच दिवशी पारगावकर यांच्या पाळीव कुत्र्यावर ही बिबट्याने हल्ला चढवला होता. 20 जानेवारीला रात्री 10.30 वाजता माळशिरस गावठाणमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ (मुख्य चौकापासून 100 मीटर अंतरावर) असलेल्या लोकवस्तीमध्ये घुसत तेथेही एका मेंढीचा फडशा पाडला.
त्यामुळे माळशिरस परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने येथील जनता पूर्णपणे भयभीत झालेली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी जाधव, वनपाल युवराज पाचर्णे, वनरक्षक गणेश पवार यांनी आज मंगळवारी पाहणी केली. पायांचे ठसे बिबट्याचे असल्याचे खात्री करून उपस्थित ग्रामस्थांना बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करावे, या संदर्भात सूचना देऊन सावधानता बाळगण्यास सांगितले. यावेळी माळशिरस येथील भुलेश्वर वन उद्यानाचे कर्मचारी काळुराम शेंडगे, चंद्रकांत यादव, माजी उपसरपंच माऊली यादव, काका यादव, राहुल यादव, इस्माईल शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.