देशभरात उडवणार सभा, मेळाव्यांचा धुरळा
प्रामुख्याने आर्थिक समस्या आणणार ऐरणीवर
नवी दिल्ली : काही काळापासून फारसे सक्रिय दिसत नसलेले कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा ऍक्शनमध्ये दिसणार आहेत. प्रामुख्याने देशातील आर्थिक समस्या ऐरणीवर आणण्यासाठी ते देशभरात सभा आणि मेळाव्यांचा धुरळा उडवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मोदी सरकारला घेरण्याच्या उद्देशातून त्यांची पहिली सभा 28 जानेवारीला राजस्थानच्या जयपूरमध्ये होणार आहे. सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर ते फारशा ऍक्शनमध्ये नसल्याचेच चित्र आहे. मात्र, सध्या का-एनपीआर-एआरसी या पॅकेजवरून देशभरात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर, मोदी सरकारची आणखी कोंडी करण्यासाठी आर्थिक मुद्द्यांवरून रान उठवण्याची रणनीती कॉंग्रेसने आखल्याचे संकेत मिळत आहेत.
त्या रणनीतीचा भाग म्हणून राहुल यांच्या सभा आणि मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस सुत्रांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यातून वाढती बेरोजगारी आणि नोकऱ्यांचा अभाव असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यामुळे तरूणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ती बाब ध्यानात घेऊन जयपूरमधील राहुल यांचे भाषण तरूण आणि विद्यार्थीकेंद्री असेल, असे त्या सुत्रांनी सांगितले.
जयपूरनंतर राहुल यांची मध्यप्रदेशात सभा होईल. त्या सभेत शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील कामगारांशी निगडीत मुद्दे राहुल यांच्याकडून मांडले जातील. ते मुंबईत लघु-मध्यम उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांचाही मेळावा घेणार आहेत. अर्थात, राहुल यांच्या सभा आणि मेळाव्यांचे पूर्ण वेळापत्रक अजून निश्चित व्हायचे आहे.