सातारा – शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत यासाठी शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्यावतीने राज्यभर जिल्हानिहाय मुल्यवर्धन मेळावे घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यातील सातशे शिक्षकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यातील एक लाख तेवीस हजार विद्यार्थी मुल्य शिक्षणाचे धडे गिरवत आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फाउंडेशनच्यावतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये मूल्य वर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सोनाली पोळ आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना शांतीलाल मुथ्था म्हणाले, संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिलीपासून रुजवण्यासाठी फाउंडेशन काम करत आहे.
बालस्नेही व विद्यार्थी केंद्रीत पध्दतीने आनंददायी वातावरणामध्ये सहयोगी अध्ययन व ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पध्दतीचा वापर करुन विविध कृती, वर्ग उपक्रम आणि शालेय उपक्रम याद्वारे सातत्याने संधी उपलब्ध करुन देणे ही मुल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना आहे.
राज्य शासनाच्यावतीने राज्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 67 हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. शांतीलाल मुथ्था म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगल्या निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचवण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. जिल्ह्यात एक लाख तेवीस हजार विद्यार्थी मुल्य शिक्षणाचे धडे घेत आहेत. जिल्ह्यातील मुल्य शिक्षणाचे 300 व्हिडिओ विद्यार्थी व शिक्षकांनी बनवले आहेत. जिल्हास्तरीय मेळाव्यात 700 शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर काम करण्यासाठी फाउंडेशनच्या दोन टीम कार्यरत आहेत. आत्तापर्यंत मुल्य शिक्षणाच्या 45 सक्सेस स्टोरी आमच्याकडे आल्या असून त्यातील तीन स्टोरी सातारा जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्हा परिषदेची डायटची टीम आणि शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हानिहाय मूल्यवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुजित मुथ्था, भरतेश गांधी व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद मैदानावर तीन दिवस प्रदर्शन
मुल्य शिक्षणाचे महत्व शालेय जीवनापासून होण्यासाठी शांतीलाल मुथ्था फाउंडेशन काम करत आहे. मुल्य शिक्षणावर आधारित चार हजार पाचशे पोस्टर्स शिक्षक व विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या पोस्टर्सचे प्रदर्शन मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार असल्याची माहिती शांतीलाल मुथ्था यांनी दिली.