माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे लोकशाहीचेच अवमूल्यन करण्यासारखे आहे, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. ते काल नवी दिल्लीत पहिलं ‘सुकुमार सेन स्मृती व्याख्यान’ देताना बोलत होते.
भारतीय लोकशाही आजवर अनेक कसोटीच्या प्रसंगातून पार झाली आहे. एकमत हा लोकशाहीचा प्राण असल्याचेही मुखर्जी यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेत लोकांचे महत्त्व अधोरेखित करत, जनता हीच तंदुरुस्त लोकशाहीची गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाने आजवर मोठमोठ्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केल्याचेही त्यांनी सांगितले.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 90 कोटी भारतीय, म्हणजे जवळपास जगातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकांच्या देशांच्या एकत्रित लोकसंख्येइतके मतदार मतदान करणार होते. इतक्या मोठ्या संख्येचे व्यवस्थापन करणे आणि पारदर्शक मतदानाची खबरदारी घेणे, हे प्रचंड अवघड काम होते, असेही मुखर्जी म्हणाले.
सुकुमार सेन यांनी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी निभावताना, पहिल्या दोन लोकसभांसाठी सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे घेतल्या होत्या. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुखर्जी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.