वाघळवाडी -पदवीनंतर विद्यार्थ्यांनी फक्त नोकरी करण्याचे उद्दिष्ट न ठेवता नोकरी देणारे बनतील, असे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन एसआरटीएम युनिव्हर्सिटी नांदेडचे कुलगुरू डॉ. पी. एन. वाघमारे यांनी केले.
सोमेश्वरनगर येथे पुणे विद्यापीठ पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवीप्रदान कार्यक्रम पार पडला, त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, प्राचार्य डॉ. संजय देवकर, उपप्राचार्य डॉ. एस. आर. गावडे, संस्थेचे सचिव भारत खोमणे, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. धनंजय बनसोडे व परीक्षा अधिकारी अतिश यादव आदी मान्यवर व सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी हजर होते.
अभियांत्रिकीच्या 125 व शास्त्र विभागाच्या एकूण 50 अशा 175 स्नातकांनी यावेळी पदवी ग्रहण केली. डॉ. वाघमारे म्हणाले, आधुनिक युगात आमुलाग्र बदल झाला; मात्र या विज्ञानाचा काळजीपूर्वक वापर करून सुदृढ समाज बनवण्यासाठी प्रत्येक स्नातकाने प्रयत्न केला पाहिजे.
आपण घेतलेल्या शिक्षणाचा फक्त नोकरीसाठी वापर न करता नोकरीत अथवा व्यवसायात तुम्ही जे काम कराल त्यात समाधान मिळाले पाहिजे. पदवी प्राप्त झाल्याने तुम्ही एक देशाचे जबाबदार नागरिक झालात, याची जाणीव ठेवून देशाच्या व संस्थेचे नाव वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
प्राचार्य डॉ. संजय देवकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत कौशल्यावर आधारित शिक्षणाचे प्रशिक्षण केंद्र सोमेश्वरमध्ये बनवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. शास्त्र विभागाचे प्राचार्य धनंजय बनसोडे यांनीही विज्ञान विभागातील यशस्वी कारकिर्दीची माहिती दिली. उपप्राचार्य एस. आर. गावडे यांनी आभार मानले.