मुंबई : मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करणे हे क्रांतिकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय. डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान 200 दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नि:क्षारीत करून मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते, परंतु त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
हे करत असताना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडे तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रूपाला येत आहे.
2025 पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल. शेवटी विकास करताना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अवेळी पडणारा पाऊस, पाण्याची वाढती मागणी पाहता नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून आज महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते म्हणाले की, यामुळे बऱ्याच दिवसांची मागणी यातून पूर्ण होईल.
एसटीपी प्रकल्पातील रिसायकल केलेले पाणी बांधकाम क्षेत्रासह इतर बाबींसाठी उपलब्ध करून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा स्रोत आणखी मजबूत करता येईल. या प्रकल्पासाठी नगर विकास विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, असेही ते यावेळी म्हणाले.