मुंबई – राज्य सरकारच्या विरोधात गेल्या 15 महिन्यांतील निर्बधांमुळे जनतेत असंतोष असून तिसऱ्या लाटेची भीती दाखवून तो दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. जनतेवरील निर्बंधामुळे सामान्य माणसांना जगण्याची विवंचना पाडली आहे. त्यातून हा अंसतोष निर्माण झाला आहे. तो व्यक्त होईल, किंवा त्याचा उद्रेक होईल या भीतीने आघाडी सरकारने तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत सामाजिक आणीबाणी लागू केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरक्षणामुळे मराठा समाजात असंतोष, ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवण्यात आलेले अपयश, बेरोजगारीचे संकट, छोट्या व्यवसायिक, व्यापारी वर्गाचे प्रश्न यामुळे जनता जेरीस आलेली आहे. दुसरी लाट, तिसरी लाट अशी भीती जनतेच्या मनात निर्माण करून लोकांना घरात बसवले जाते. मात्र त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताच प्रयत्न या सरकारकडून केला जात नाही, असे ते म्हणाले.
राज्य सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत नव्याने निर्बंध लागू केले आहेत. राज्यात सतत लॉकडाऊन करूनही राज्यात सर्वाधिक रूग्ण, मृत्यू आणि प्रभावी उपाययोजनांचा अभाव या बाबतीत राज्याचाच क्रमांक पहिला लागतो. राज्यासमोरचे प्रश्न पाहता जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.
या संतापलेल्या जनतेला तोंड देऊ लागू नये म्हणून महाविकास आघाडीचे सरकार नव्याने निर्बंध लागू करत आहे. देशभरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. या घटनेला आता 15 महिने होत आले. तरी करोनाच्या बाबतीत राज्यातील परिस्थिती सुधारलेली नाही.
सततच्या निर्बंधांमुळे जनतेपुढील समस्या वाढतच आहेत. मात्र राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही हे सरकारच्या धोरणावरून वारंवार दिसून येते. करोनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी या सरकारकडून लादली जात आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली.