संगमनेर – राष्ट्रीय महामार्ग ते मालदाड या रस्त्याच्या कामासाठी सरपंच गोरक्षनाथ नवले व ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण आज तिसऱ्या दिवशी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. तालुक्यातील 77 कोटींच्या रस्त्यांसह विविध विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती ही अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
मालदाड, सोनुशी, नान्नज चिंचोली गुरव हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून, या रस्त्याच्या कामाकरिता आमदार बाळासाहेब थोरात यांनी 19 कोटी रुपये मंजूर केले आहे. मात्र, या कामाला सध्याच्या सरकारने व पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने याबाबत आमदार थोरात यांनी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला होता. मात्र, तरीही रस्त्याचे कोणतेही काम सुरू झाले नाही म्हणून मालदाडचे सरपंच व ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला मालदाडमधील महिला, वृद्ध ,तरुण, नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तीन दिवस शेकडो नागरिक या ठिकाणी येऊन उपोषणास बसले होते.
कॉंग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या उपोषणाला भेट देऊन या रस्त्याचे काम तातडीने होण्याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन लावून डीपीडीसी व 30- 54 मधून तातडीने काही निधी उपलब्ध करून हे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सात दिवसांत रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे लेखी निवेदन बीडीओ नागणे यांनी दिले. सरपंच गोरक्षनाथ नवले यांनी आ. थोरात यांच्याहस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
पालकमंत्री व सरकारविरुद्ध नागरिक संतप्त
संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामे यांना पालकमंत्री व विद्यमान सरकार यांनी स्थगिती दिली असून या जुलमी व स्थगिती सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे मालदाडचे ग्रामस्थ व महिला यांनी निवेदनात म्हटले.
===============