वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी वरंध (ता. महाड, जि. रायगड) ते रायगड जिल्हा हद्द, हा वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी १ एप्रिल ते ३० मे, असा दोन महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली असल्याने हा घाट पुढील दोन महिने बंद राहण्याची शक्यता आहे. भोर प्रशासनाने बंदबाबतचा कोणताही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या राजेवाडी (ता. महाड) ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भीती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतीपथावर आहेत. सद्य:स्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये (भोर हद्दीपर्यंत) संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून, बहुतांश काम पूर्ण झालेले आहे.
परंतु पारमाचीवाडी ते रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे आहे, सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून, रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. यामुळे १ एप्रिल ते ३० मेपर्यंत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी, अशी विनंती संदर्भीय पत्रान्वये केलेली आहे.
प्रशासन वरंध घाट बंदबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने रायगड पोलिस अधीक्षक यांचे अभिप्राय मागितलेले आहेत. मात्र, अद्याप बंदबाबतचा कोणताही आदेश प्राप्त नाही. – राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, भोर