हैदराबाद – भारताची दिव्यांग बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचा निर्धार व्यक्त केला आहे. तीने या स्पर्धेत मिश्रदुहेरीत खेळण्याचे निश्चित केले आहे. पॅरालिम्पिकमध्ये एकेरीच्या स्पर्धा होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे मानसीने सांगितले.
योगायोगाने माझी प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याशी भेट झाली व कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी मला त्यांच्या येथील अकादमीत बोलावले व सरावासाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडूनच मला व्यावसायिक बॅडमिंटनचे धडे मिळाले. जागतिक स्तरावरील सर्वांत मानाच्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळाले त्यात माझ्या खेळाबरोबरच गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा आहे. आता पुढील वर्षी जपानमध्ये टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा होत असून त्यातही सरस कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे, अशी इच्छा मानसीने व्यक्त केली.
जागतिक पॅरा स्पर्धेत मला यश मिळाले त्यानंतर माझ्याकडे पाहण्याचा खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा बॅडमिंटन समीक्षकांचा दृष्टिकोनच बदलला. त्यात गोपीचंद यांनी सातत्याने केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या अकादमीत पी. व्ही. सिंधूदेखील सराव करते. तिचा खेळ व सराव पाहण्याची व त्यातून शिकण्याची संधीही मला गोपीचंद यांच्यामुळेच मिळाली. मला एक गोष्ट जाणवली की ते, केवळ प्रमुख खेळाडूंचाच सराव पाहात नाहीत तर माझ्यासारख्या दिव्यांग खेळाडूंचाही सराव तासन्तास पाहतात. त्यांना काही सल्ला द्यावासा वाटला तर ते स्वतः पुढाकार घेतात. माझा खेळ कसा होत आहे, त्यात काय त्रुटी राहते याकडेही त्यांचे कायम लक्ष असते. त्यांच्या सुचना प्रत्यक्ष खेळात आणण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला असून टोकियो पदकाचे माझे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वासही मानसीने व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी जकार्तामध्ये आशियाई पॅरा स्पर्धा झाली. त्यावेळी माझी काहीच तयारी झालेली नव्हती. ही अडचण जेव्हा गोपीचंद यांना समजली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या अकादमीत यायला सांगितले व सातत्याने वेळ देत माझ्या सरावाकडे लक्ष दिले, माझी तयारी करून घेतली. त्यांच्यासह अव्वल प्रशिक्षक जे. राजेंद्रकुमार यांनीही गोपीचंद यांच्या सूचनेनूसार मला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. तेथूनच माझ्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. सराव चांगला होत होता व त्यामुळेच पूर्णतयारीने त्या स्पर्धेत सहभागी झाले व यशही मिळवले. आता त्याचीच पुनरावृत्ती टोकियोत करायची आहे, असेही तिने सांगितले.
लहानपणापासून बॅडमिंटनची आवड होती. मात्र, हाच खेळ माझी कारकीर्द ठरेल असे कधीच वाटले नाही. जेव्हा मी विश्वविजेतेपद पटकावले तेव्हा माझ्या कामगिरीवर माझाच विश्वास बसत नव्हता. गोपीचंद यांच्यासह ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचा या यशात मोठा वाटा आहे. पुढील काळातही पॅरालिम्पिकसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा होत आहेत. त्यातही मला यश मिळेल, असा विश्वासही मानसीने व्यक्त केला.
अपघाताने घडली कारकीर्द….
मानसीला 2011 साली एका अपघातात आपला डावा पाय गमवावा लागला होता. त्यावेळी प्रचंड खचलेल्या मानसीने फिनिक्स भरारी घेत आज पॅरालिम्पिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एका बॅंकेत नोकरी करणारी मानसी आज आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपाला आली आहे. एक अपघात संपूर्ण आयुष्याला कलाटणी देत वेगळ्याच क्षेत्रात कारकीर्द घडवू शकतो हे मानसीकडे पाहिल्यावर लक्षात येते.