फायरब्रॅंड पाकिस्तानी धर्मगुरूचा इशारा
कराची -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे दिवस भरले आहेत, असा इशारा त्या देशातील फायरब्रॅंड धर्मगुरू अशी ओळख असणाऱ्या मौलाना फजलूर रेहमान यांनी दिला आहे. त्यामुळे राजकारणात सक्रिय असणारे रेहमान पुन्हा इम्रान यांच्याविरोधातील मोहीम तीव्र करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
इम्रान सरकारची मुळे छाटली गेली आहेत. आता त्या सरकारचे काही दिवसच शिल्लक आहेत, असा दावा रेहमान यांनी खैबर पख्तुनख्वामधील धरणे आंदोलनावेळी केला. इम्रान यांच्या राजीनाम्याची मागणी करत रेहमान यांनी काही दिवसांपूर्वी आझादी मोर्चा काढला. त्या मोर्चात मोठ्या संख्येने निदर्शक सहभागी झाले. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्षांनीही मोर्चाला पाठिंबा दिला. त्यामुळे पाकिस्तानात इम्रान यांच्या विरोधातील नाराजी वाढत असल्याचे सूचित झाले.
आता इम्रान सरकारला धडकी भरायला लावणाऱ्या मोर्चानंतर रेहमान यांनी धरणे आंदोलन हाती घेतले आहे. इम्रान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणविषयक आघाड्यांवर इम्रान सरकारला सपशेल अपयश आल्याचा आरोप त्यांनी लावून धरला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रामुख्याने त्या मुद्द्यावरून रेहमान यांनी इम्रान सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे.