गेल्या काही वर्षांमध्ये बदलत गेलेल्या समाजरचनेबाबत, भावनाविश्वाबाबत आणि एकंदरीतच जीवनशैलीबाबत सर्वांनाच चिंता वाटत असते. समाजातील वेगवेगळे विचारवंत याविषयी सातत्याने लिहित-बोलत असतात. पण बॉलीवूडमधील कलाकारही याबाबत अस्वस्थ दिसून येतात. अलीकडेच शिल्पा शेट्टीने याबाबत जाहीरपणानं आपली मतं मांडली आहेत.
“व्हूट’वरील “टिकटॉक प्रेझेंटस् वर्क इट अप या शोमध्ये बोलताना शिल्पा म्हणते की, आजच्या काळात प्रेम ही भावना गुंतागुंतीची झाली आहे. 1990 च्या दशकात ती खूप साधीसरळ होती. आमच्याकडे तेव्हा मोबाईलफोनही नव्हते. 1990 पर्यंत ते आपल्या आवाक्याबाहेर होते.
सर्वसामान्यांसाठी तर मोबाईल हा स्वप्नवत होता. 1996 पर्यंत साधारण अशी स्थिती होती. पण 1990 च्या काळात प्रेम ही संकल्पना खूप वेगळ्या पद्धतीनं दिसायची. त्यामध्ये एक वेगळीच मजा होती. आम्ही नंबर डायल करुन ब्लॅंक कॉल करायचो. आता ती गोष्टच उरलेली नाही.
आज सगळं काही खुलेआम झालं आहे. पण या सर्वांमुळं नात्यांमध्ये बदल झाले आहेत. त्यातील दबाव वाढला आहे. सगळं काही मोकळेपणानं बोलूनही नाती अधिक घट्ट होण्याऐवजी त्यांची वीण उसवताना दिसत आहे. माझ्या मते काळासोबत सर्वांनाच जावंच लागतं; पण तरीही आपली मूल्य कुणीही सोडू नयेत असं मला वाटतं.