लोणी धामणी -लग्नसोहळ्यात करोना संसर्ग होऊ नये यासाठी परिसर निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून विशेष काळजी घेतली जात आहे. तर, वऱ्हाडी मंडळींचा सन्मान टॉवेल-टोपीऐवजी मास्क-टोपी देण्याचा अनोखा प्रयोग करून शिरदाळे (ता. आंबेगाव) येथील सरडे-इचके कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
करोना महामारीने लग्न सोहळे अडचणीत सापडले आहेत. शासनाने करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभ साजरा करण्याची नियमावली तयार केली आहे. त्यामुळे बहुतांश लग्न जुन्या पारंपरिक पद्धतीने घरासमोरच मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडत आहे.
सरडे कुटुंबातील मयूर यांचा विवाह पूजा यांच्याशी नुकताच पार पडला. या सोहळ्यात उभय परिवाराने साखरपुडा टिळा कार्यक्रमात प्रत्येकाला मास्क वाटप करून आम्ही करोना लढाईत सहभागी आहोत तुम्ही पण काळजी घ्या, असा संदेश दिला आहे. या अनोख्या उपक्रमाचे आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले तसेच सर्व उपस्थितांनी कौतुक केले आहे