आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अर्थात कार्तिक सोहळ्यानिमित्त अलंकापुरीत रविवार (दि. 6) ते मंगळवार (दि. 15) पर्यंत आळंदीत येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करून संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी दिली.
माऊलींचा समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिक सोहळा रंगणार आहे. सोहळा मंगळवार (दि. 8) ते सोमवार (दि. 14) पर्यंत चालणार आहे. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याप्रसंगी गर्दी
होवू नये म्हणून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून पंढरपूरच्या धर्तीवर संचारबंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
देवस्थानचे विश्वस्त ऍड. विकास ढगे-पाटील म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा आदेश पाळून सोहळा पार पाडली जाईल. वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी मंदिरात थर्मल स्कॅन करून प्रवेश दिला जाईल. देऊळवाड्यात मंगळवारी गुरू हैबतबाबा पायरीपूजनासाठी 30 जणांना परवानगी आहे.
माऊलींच्या समाधीवरील महापूजा आणि दर्शन लाईव्ह स्वरूपात सोशल मीडिया आणि चॅनलद्वारे दाखविले जाणार आहे. तसेच सोहळा काळात 500 ते 600 वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाधिकारी देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
या गावांमध्ये संचारबंदी
आळंदीसोबतच चऱ्होली खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोर, सोळू, मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक, डुडुळगाव या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू राहणार आहे. आळंदीला येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी असून प्रवासी वाहतूक बंद राहील. तर मरकळ, शिक्रापूर चाकणकडे जाणारी औद्योगिक वाहने आळंदीतून न येता चऱ्होली-आळंदी बायपास आणि पुणे नगर महामार्गावरून वळविण्यात येणार आहे.
कार्तिकी एकादशी शुक्रवारी (दि. 11) पहाटपूजेकरीता आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी 50 जणांना मंदिर प्रवेश राहील. कीर्तन जागराला साथ देण्यासाठी 15 टाळकऱ्यांना परवानगी आणि परंपरेने सेवा करणाऱ्या कुटुंबातील पाच व्यक्तींनाच प्रवेश आहे. सेवा झाली की लगेच माघारी फिरावे लागणार आहे.
– ऍड. विकास ढगे-पाटील, विश्वस्त, आळंदी देवस्थान