मुंबई – मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून करता येणार आहे. देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचे आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित होते.
या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असताना आणखी प्रतीक्षा का करायची? अशी भूमिका घेत आघाडी सरकारने या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्राला प्राधान्य दिले त्याबद्दल केंद्राचे धन्यवाद. समुद्राची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली आणि आरमार उभारले. येत्या काही वर्षात समुद्राचे पाणी आपण पिण्यायोग्य करतोय. राजकारण राजकारणाच्या जागी असते. मात्र लोकांची सेवा झाली पाहिजे. तसेही पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान नाही तर प्रधानसेवक म्हणतात.
बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटं, तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
स्पीडबोटीचे भाडं प्रति प्रवासी 800 ते 1200 रुपये, तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी 290 रुपये इतकं ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवण्यात येणार आहे.