नवी दिल्ली – करोनाबाधितांचा मृत्यू होण्याचा जागतिक दर सध्या 6.65 टक्के इतका आहे. त्यापेक्षा भारताचा करोना मृत्यूदर निम्म्याहून कमी म्हणजे 3.06 टक्के इतका आहे. जगाच्या तुलनेत देशाची स्थिती चांगली असण्यामागे रूग्णाचा वेळेत शोध आणि सुनियोजित वैद्यकीय उपचार ही पाऊले कारणीभूत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी नमूद केले.
देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत आणखी 5 हजार 609 करोनाबाधित आढळले. ती संख्या देशात एकाच दिवसात नोंद झालेल्या करोनाबाधितांच्या उच्चांकापेक्षा 2 ने कमी आहे. मागील 24 तासांत 3 हजार 2 बाधित करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत 45 हजारांपेक्षा अधिक रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. ते प्रमाण आता 40.32 टक्क्यांवर पोहचले आहे.
करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांचे विश्लेषणही आरोग्य मंत्रालयाने केले. त्यानुसार, देशातील मृतांमध्ये 64 टक्के पुरूष, तर 36 टक्के महिला आहेत. देशातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक मृत 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील आहेत. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 35 टक्क्यांहून अधिक रूग्ण करोनाचे बळी ठरले आहेत. 30 ते 45 वर्षे वयोगटातील मृतांचे प्रमाण 11.4 टक्के इतके आहे. 15 ते 30 वर्षे वयोगटातील 2.5 टक्के रूग्ण करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत. 15 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण 0.50 टक्का आहे. देशातील एकूण मृतांमध्ये इतर आजार असणाऱ्या करोनाबाधितांचे प्रमाण तब्बल 73 टक्के आहे.