पुणे -पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये आपले पाय घट्ट रोवणाऱ्या करोना व्हायरसने संपूर्ण पुणे जिल्हा म्हणजेच 13ही तालुक्यात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 19) पर्यंत पुरंदर तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला नव्हता मात्र, वीरमधील एकाचा बुधवारी (दि. 20) खासगी लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचा शासकीय अहवाल गुरुवारी (दि. 21) पॉझिटिव्ह आल्याने करोनामुक्त असलेल्या एकमेव तालुक्यातही करोना रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण जिल्हाच करोनाच्या विळख्यात आला आहे. ही सर्व माहिती (दि.20) पर्यंतची आहे.
करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधील पहिले दोन टप्पे अतिशय कडक होते त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा प्रसार त्या वेगाने झालेला नव्हता. मात्र, तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याबरोबरच लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना गावी ये-जा करण्यास परवानगी दिल्याने ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण झपाट्याने आढळत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तर चौथ्या टप्प्यात अगदी बोटावर मोजण्या इतके अपवाद वगळता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास परवानगी दिल्याने आता ग्रामीण भागात करोनाचा कहर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एकतर नियम कडक करून त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे, अशी मागणी जोर धरीत आहे. पुणे ग्रामीण, नगरपरिषद आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मिळून हवेली आणि वेल्हा तालुक्यात सर्वाधित बाधित व्यक्ती आहेत.
भोर, शिरूर, बारामती, मुळशी, मावळ आणि खेड तालुक्यात दहाच्या आत बाधित व्यक्ती आहे. तर आंबेगाव, पुरंदर, दौंड, इंदापूर आणि जुन्नर तालुक्यात एक ते तीन बाधित व्यक्ती आहे. पुणे ग्रामीणमध्ये 121 बाधित असून, त्यामध्येही बहुतांश भाग शहरात असलेल्या एकट्या हवेली तालुक्यात 57 बाधितांचा समावेश आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष ग्रामीण भाग असलेल्या परिसरात 65 बाधित व्यक्ती आहेत. मुळशी तालुक्यात सापडलेले 6 बाधित व्यक्तीतील 5 व्यक्ती या हिंजवडी परिसरातील आहे. तर शिरूर तालुक्यात 7 रुग्ण आढळी असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
कठोर निर्णय घेण्याची गरज
ग्रामीण भागात आजही प्रादुर्भाव आटोक्यात असून, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला कठोर निर्णय घेऊन तात्काळ अंमलबाजवणी करणे आवश्यक आहे. सध्यस्थितीत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे.
मात्र, पुणे, मुंबई किंवा गावाहून कामानिमित्त पुणे शहरात येणाऱ्या वक्तींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेबरोबर गावातील ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची महत्वाची भूमिका असून, आपल्या तालुक्यात किंवा गावात करोनाचा एकही रूग्ण सापडणार नाही, याचा पण करून त्यानुसार गावपातळीवर नियोजन करणे आवश्यक आहे.
24 तासांत 17 बाधित
गेल्या 24 तासांत आणखीन 17 बाधित व्यक्ती सापडल्या आहेत. जिल्ह्यातील कॅन्टोमेंट (पुणे, खडकी, देहू), नगरपरिषद हद्द व तालुक्यात एकूण 378 रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला असून 117 जणांना घरी सोडले असून 264 जणांवर उपचार सुरू आहेत.