पाटणा – देशात सध्या अराजकासारखी स्थिती निर्माण होत असून देश यादवी युद्धाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असा इशारा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांनी दिला आहे. देशात महागाई आणि बेरोजगारीने सामान्य जनता कमालीची त्रस्त असून त्याच्या विरोधात सामान्य जनतेने आता एकत्र आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या भाजप ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे देश गृहयुद्धाकडे वाटचाल करत आहे असे ते म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरजही आहे. हे एकत्रिकरण झाले की भाजपला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लालूंना एप्रिलमध्ये झारखंड उच्च न्यायालयाने डोरंडा ट्रेझरीमधून 139.35 कोटी रूपये इतकी रक्कम बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण चारा घोटाळ्याशी संबंधित आहे.चारा घोटाळ्याशी संबंधित हे पाचवे प्रकरण आहे. या आधीच्या चारही प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.