नवी दिल्ली,- भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित महंमद यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. अनेक इस्लामिक देशांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करून भारताचा निषेध केला आहे. भारताने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणीही काही देशांनी केली आहे.
कतार, कुवेत, इराण या देशांनी भारतीय दूताला पाचारण करून त्यांच्याकडे या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतात इस्लामच्या विरोधात तसेच मुसलमानांच्या विरोधात असहिष्णुता वाढीला लागली असल्याची या देशांची तक्रार असून इस्लामिक देशांच्या संघटनेच्या सरचिटणीसांनीही या प्रकरणात भारतावर नाराजी व्यक्त करणारे वक्तव्य जारी केले आहे.
वरील देशांबरोबरच सौदी अरेबियानेही या प्रकरणात भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे वक्तव्य अवमानकारक असल्याचे म्हटले आहे. भारताने सर्वच धर्मांच्या भावनांचा सन्मान करून त्यांच्या विषयी विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. कुवेत व कतार या दोन देशांनी या प्रकरणात भारताने माफी मागितली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे की, भारतातील सध्याचे सरकार धार्मिक स्वातंत्र्य आणि मुस्लिमांच्या अधिकारांवरच हल्ले करीत आहे.