मुंबई – करोनाच्या भयंकर आपत्तीतून भारताची बरीच वाट लागली असून तरीही पंडित नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, मनमोहनसिंग या पंतप्रधानांनी केलेल्या कामामुळेच देश आज तगून राहिला आहे. त्यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प, व आत्मविश्वासावरच आज भारत तगून राहिला आहे. ती मोठी पुण्याई आहे अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारला या कामांची जाणिव करून दिली आहे.
आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखातून शिवसेनेने ही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील दहा दिवसांत भारतात करोनामुळे 36 हजार 110 बळी गेले आहेत. हा आकडा धडकी भरवणारा आहे. करोनाच्या बाबतीत आपण अमेरिका आणि ब्राझिलला मागे टाकले आहे. हे चित्र बरे नाही. जगाला आता भारताची भीती वाटू लागली आहे. अनेक देशांनी आपल्या नागरीकांना भारतात जाण्यापासून रोखले आहे. भारतातून येणारी विमाने त्यांनी बंद केली आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका भारताला बसला आहे. तरीही कॉंग्रेसच्या पंतप्रधानांनी गेल्या 70 वर्षात उभ्या केलेल्या कामांमुळेच भारत तगून आहे. नाही तर करोनाच्या लाटेत 125 कोटी लोक कधीच नष्ट झाले असते.
हिंदुस्थानात पेटेलेल्या चितांचा धूर आजुबाजुच्या देशांना गुदमरून टाकत आहे. हा धूर आपल्या देशात पसरू नये म्हणून अनेक गरीब देश आपल्याला मदत करीत आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान, रवांडा, कांगो सारख्या देशांवर येत असे. आज चुकीच्या राज्यकर्त्यांमुळे ही वेळ भारतावर आली आहे. गरीब देशही आपल्या ऐपतीनुसार भारताला किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले पंतप्रधान 20 हजार कोटी खर्चाचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. अशा प्रकल्पांवर हजारो कोटी रूपये उधळपट्टी करायची आणि भूतान, बांगलादेश, श्रीलंका या छोट्या देशांकडून मदत स्वीकारयची अशी भीषण वेळ भारतावर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला चाबकाने फोडून त्यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. या संकट काळात सरकारचे डोके चालणे एकतर बंद झाले आहे किंवा त्यांनी शस्त्रे खाली टाकून दिली आहेत अशी टिपण्णीही यात करण्यात आली आहे.