नवी दिल्ली, दि. 8 – आसामातील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदावर दावे सांगणारे सोनोवाल आणि हिमंत विश्व शर्मा हे दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. आज हिमंता शर्मा यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री सोनोवाल यांनीही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. तथापि शनिवारी सर्वात प्रथम हिमंता शर्मा यांनी नढ्ढा यांच्या निवासस्थानी जाऊन प्रथम त्यांच्याशी चर्चा केली. नंतर त्यांनी अमित शहा यांच्याशीही चर्चा करून आपले मनोगत त्यांना ऐकवले. आता सोनोवाल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय केला जाईल असे सांगण्यात येते.
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार प्रोजेक्ट केलेला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री नेमके कोणाला करायचे हा पेच तिथे निर्माण झाला आहे. या पदावर दोघांनीही आक्रमकपणे आपले दावे सादर केले असून दोघांनीही आपआपल्या समर्थक आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींपुढील पेच वाढवून ठेवला आहे. 126 जागांच्या विधानसभेत भाजपला 60 तर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या आसाम गणसंग्राम परिषदेला 9 जागा मिळाल्या आहेत.