नगर, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे गेल्या चार महिन्यांपासून बिल थकीत आहे. बिल न दिल्यास दहा मार्चला ठेकेदाराने काम बंद करण्याचा इशारा दिला होता. दहा मार्च उजडला तरी मनपाने थकीत बिल न दिल्याने रविवार (दि.१०) रोजी शहरात सर्वत्रच कचरा पडल्याचे दिसत होते.
महापालिका हद्दीतील कचरा संकलनाचा ठेका श्रीजी कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीकडून सुरळीत कचरा संकलन सुरू असताना, गेल्या चार महिन्यांपासून कचरा संकलनाचे बिल थकले आहे. हे बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दिले जाते. परंतु, महापालिकेला अद्याप पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यात ठेकेदाराचे बिल बुजविण्यासाठी मनपाकडे स्वनिधी देखील नाही. ठेकेदाराचे नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ व जानेवारी, फेब्रुवारी २०२४ अशा चार महिन्यांचे बिल थकीत आहे.
त्यामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा मेंटेनन्स करणे, कर्मचाऱ्यांचे पगार देणे मुश्किल झाले आहे. बिल न मिळाल्याने ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना पगार झाले नाही. परिणामी कचरा वाहने चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.