पारनेर, (प्रतिनिधी)- पारनेर बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अचानक बाजारभाव कमी झाल्यामुळे लिलाव बंद पाडत तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन केले. शेतकऱ्यांसोबत पदाधिकारी सचिव व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत बुधवारचे लिलाव स्थगित करून गुरुवारी पुन्हा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. अचानक बाजारभाव कोसळल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पारनेर बाजार समितीत १२ ते १३ रुपये चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव मिळाला. हा भाव गेल्या लिलावास २२ ते २६ रुपये प्रमाणे होता. केंद्र सरकारच्या गेल्या चार दिवसांपूर्वीच्या कांदा निर्यात खुल्या धोरणामुळे कांदा बाजारभाव २२ ते २६ रुपये झालेला होता. त्यामुळे परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला बाजार मिळेल, या आशेने कांदे मार्केटमध्ये आणले परंतु लिलाव सुरू होताना १२ ते १३ रुपये चांगल्या प्रतीचा कांदा विकला गेला.
कमी प्रतीचा कांदा २ ते ५ रुपयेप्रमाणे गेल्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणांमुळे शेतकऱ्यांचा बळी जात आहे. जोपर्यंत २२ ते २५ रुपये दराने कांदा लिलाव होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी पारनेर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू करण्यास मनाई करत आहे.
शेतकऱ्यांच्या भावना शासनास कळवत असून मुख्यमंत्री व प्रधानमंत्री कार्यालयास शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी प्रकाश पवार, प्रवीण थोरात, बाळासाहेब रासकर, अमोल टकले, किरण रासकर, किसन दुधाडे, रामदास खामकर, शिवनाथ लोंढे, सुदाम मस्के, प्रवीण साबळे, प्रवीण शिंदे, सुभाष चत्तर आदी शेतकरी उपस्थित होते.
सर्वत्र कांद्याचे ढीग
रविवारी बाजार समितीत 20 ते 26 रुपयेपर्यंत कांद्याला बाजार भाव मिळाला. दोन दिवसांंत हे दर थेट दहा रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली. योग्य बाजारभाव मिळण्याची मागणी केली. रविवारी झालेल्या लिलावात 23,860 गोण्यांची आवक झाली होती.
बुधवारी हीच आवक 50 ते 60 हजार गोण्यांची झाल्याने बाजार समिती परिसरात सर्वत्र कांद्याचे ढीग व कांदा घेऊन आलेले वाहने दिसत होती.