नवी दिल्ली – लंडनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या ‘आयडियाज फॉर इंडिया’ परिषदेत राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.
गौरव भाटिया म्हणाले की, राहुल गांधी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या सेमिनारला जातात आणि तिथे जाऊन देशाची प्रतिमा मलिन करतात. राहुल गांधी आणि गांधी परिवार, पंतप्रधान मोदींचा तिरस्कार करताना भारत मातेच्या विरोधात वक्तव्ये करतात. तुम्ही भाजपला विरोध करू शकता, हा राजकारणाचा भाग आहे. पण जर तुम्ही आमच्या देशाला अपशब्द बोललात, बिनबुडाचे आरोप केलेत तर त्याला भाजपह देशातील जनताही विरोध करेल, असं गौरव भाटिया म्हणाले.
गौरव भाटिया पुढं म्हणाले की, संपूर्ण देशाला माहित आहे की रॉकेल कोण घेऊन जाते. तुम्ही 1984 पासून रॉकेल घेऊन फिरत आहात. खर पाहिलं तर काँग्रेस पक्ष रॉकेल शिंपडतो. 1984 चा नरसंहार, काँग्रेस नेत्यांनी घडवून आणला होता. देश पेटला पाहिजे अशी तुमची नेहमीच इच्छा आहे, असा आरोपही भाटिया यांनी केला.
जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि त्यांचे अपयशी नेते राहुल गांधी परदेशात जातात, मग ते लंडन, अमेरिका, सिंगापूर असो, त्यांच्या विधानांवरून कुठेतरी दिसून येते की आजचा काँग्रेस पक्ष 1984 पासून आग लावणे, सुसंवाद बिघडवणे हे सुरूच आहे.