नवी दिल्ली – सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजच्या 50 वर्षीय सहयोगी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतिहास शिकवणारे प्रोफेसर रतन लाल यांनी मंगळवारी शिवलिंगाचे छायाचित्र पोस्ट करून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रतन लाल यांना आधी चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. डीसीपी (उत्तर) सागर सिंग कलसी यांनी शुक्रवारी रात्री अटकेची पुष्टी केली. प्राध्यापकाच्या अटकेनंतर एआयएसएसह काही विद्यार्थी संघटनांनी मॉरीस नगर येथील पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली होती.
The arrest of Dr. Ratan Lal, Prof of History at Hindu College, DU, is effective from May 20, under FIR no. 50/22 & under sections 153A/295A IPC: Cyber Police Station, North District
— ANI (@ANI) May 20, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन लाल यांच्यावर भादंवि कलम 153-ए (धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि 295-ए (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेले दुर्भावनापूर्ण कृत्य) अन्वये सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा सायबर पोलिस ठाण्यात रतनलाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत विविध पक्ष आणि संघटनांकडून जोरदार भाषणबाजी सुरू आहे.
रतन लाल यांनी पोलिसांकडे मागितली होती सुरक्षा –
सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, रतन लाल यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला की, त्यांना ऑनलाइन अनेक धमक्या आल्या होत्या आणि त्यांनी पोलिस संरक्षण आणि मदत मागितली होती. बुधवारी रतन लाल यांनी सांगितले होते की, “या विधानासाठी धमक्या आणि शिवीगाळ होईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी टीकाही केलेली नाही, ते फक्त निरीक्षण आहे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीबद्दल धार्मिक भावना दुखावल्या जातात. लोक काय करतील, फक्त तोंडावर पट्टी बांधावी?”
काय होती वादग्रस्त पोस्ट –
रतनलाल यांनी पोस्टमध्ये लिहिले की, जर शिवलिंग आहे तर वाटते की शिवजींचाही खतना करण्यात आला होता. आणि पोस्ट संपवल्यावर हसण्याचा इमोजी टाकण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी रतनलाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने म्हंटले की, “130 कोटी लोकसंख्येच्या देशात प्रत्येक विषयावर 130 प्रकारची मते असू शकतात. एका माणसाच्या भावना दुखावल्याने संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या जातात असे होत नाही. तिथे काय सापडले आहे, ते काय आहे, ते अजून स्पष्ट झालेले नाही., असे न्यायालायने म्हंटले आहे.