सोरतापवाडी – संपूर्ण जगाला हादरून सोडलेल्या करोनाच्या भीतीने शेतमालाला उठाव न झाल्याने बाजारभाव गडगडला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे पूर्व हवेलीतील शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळाले आहेत. भाजीपाल्यांचे बाजार भाव निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना बाजारभावासाठी वाट पाहावी लागत आहे. करोनामुळे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
करोनाच्या भीतीने शेतमाल खरेदी करणाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण परिसरात अद्यापही पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे फळभाज्या, पालेभाज्या यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे, परंतु करोनाच्या भीतीने येणाऱ्या ग्राहकांची संख्या तुलनेने कमी झाली आहे.
त्यातच फ्लॉवर आणि कोबीचा गड्डा दहा रुपयाला तर भाजी पाल्याची जुडी मेथी, कोथिंबीर, पालक यांनाही दोन रुपयांपासून ते पाच रुपयांच्या आतच बाजारभाव मिळत आहे. कांदापातही तीन ते पाच रुपयांच्या आतच विक्री होत आहे.
बाजारभाव पडल्याने मजुरी तर परवडत नाही. तसेच न विक्री झालेला शेतमाल पुन्हा जनावरांना खाद्य घालण्यासाठी परत न्यावा लागत आहे किंवा बाजारातच टाकून देऊन शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत.
कल्पना चौधरी, महिला शेतकरी