नवी दिल्ली – व्यापक सल्लामसत केल्यानंतरच हे तीन कृषी कायदे आणले गेले आहेत हा केंद्र सरकारचा दावा साफ खोटा असून ती बाब माहितीच्या अधिकारातच उघड झाली आहे. केंद्र सरकारने हे कायदे करताना कोणाशीच सल्लामसलत केली नाही, किंवा चर्चा केली नाही त्यामुळेच सध्याची सारी समस्या उद्भवली आहे अशी टीका कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.
त्यामुळे सरकारने कोऱ्या पाटीपासून या विषयी सुरूवात केली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चेची नववी फेरीही अनिर्णित अवस्थेत संपली त्या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की हे असेच घडणार होते. चर्चा यशस्वी होत नाही याचा सारा दोष सरकारचाच आहे. सदोष कायद्यांपासून सरकार मागे हटण्यास तयार नाही त्यामुळे ही कोंडी फुटत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हे कायदे करण्यात जी चूक झाली आहे ती मान्य करून सरकारने आता या संबंधात कोऱ्या पाटीने सुरूवात केली पाहिजे असेही चिदंबरम यांनी सरकारला सुचवले आहे. सप्टेंबर मध्ये करण्यात आलेले हे कृषी कायदे म्हणजे मोठ्या कृषी विषयक सुधारणा आहेत असा दावा सरकार करीत आले आहे पण शेतकऱ्यांनी हा दावा साफ फेटाळला आहे.