मुंबई – वेल्हे तालुक्यातील दुर्गम भाग आलेल्या चीरमोडी गावातील अंगणवाडीने अभिनव प्रयोग राबविला आहे. विद्यार्थी दशेतच लहान मुलांना काही नवीन शिकण्याची गोडी लागते. त्यावेळी मिळालेले ज्ञान हे त्यांना केव्हाही उपयुक्त ठरणारे असते. त्यासाठी शिक्षक नेहमीच शाळेत विद्यार्थ्यांकरिता काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात.
वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या चीरमोडी अंगणवाडीत राबविलेल्या उपक्रमाची भरपूर चर्चा होत आहे. ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ प्रकल्पाअंतर्गत चीरमोडी आणि पंचक्रोशीतील अंगणवाड्यांनी लहान मुलांमध्ये जिज्ञासा अन् कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना खेळाच्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले.
पोषण रॅली, पोषण परी, पोषण प्रतिज्ञा देखिल घेण्यात आली. याच बरोबर व्यवहार कळवा, बाजारपेठेची ओळख व्हावी म्हणून छोटी-छोटी दुकाने देखील तयार केली होती. सोबतच अंगणवाडी शाळांची रंगरंगोटी करून विविध चित्रांनी भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. बालकांना रमण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पुरविण्यात आले.
अंगणवाडी सेविकांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, हा नाविन्यपूर्ण आणि महत्त्वकांक्षी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून सर्वांगीण विकास साधणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे चिरमोडीच्या अंगणवाडी शिक्षिका भाग्यश्री पुरोहित यांनी सांगितले.