पुणे, (प्रतिनिधी)- महायुतीमधील जागांचे वाटप अद्याप निश्चित झालेले नाही. येत्या दोन दिवसांत कुठल्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा हे कळेल. शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे की शिवसेनेकडे याचा निर्णय झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे सांगत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
चिंचणी येथील घोड धरणातून शिरूर शहरासाठी नव्याने पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, याकामी राज्य सरकारने तब्बल 70 कोटी 66 लाख रुपयांचा निधी दिला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन झाले. या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आढळराव पाटील यांनी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचा पुनरुच्चार केला.
यानिमित्ताने पाबळफाटा येथे झालेल्या कार्यक्रमास नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे व उज्वला बरमेचा, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर व जाफिरखान पठाण, युवासेनेचे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष संताप शितोळे, भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव,
रिपब्लिकन पक्षाने शहराध्यक्ष नीलेश जाधव, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक धरमचंद फुलफगर, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कटके, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, एजाज बागवान, श्रुतिका झाबरे, रेश्मा शेख, सुपार भदाणे, विठ्ठल पवार, अंजली थोरात, सुनीता कुरवळे, मनीषा कालेवार, संगीता मल्लाव आदी या वेळी उपस्थित होते.
शिरूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घोड धरणातून जलवाहिन्याद्वारे पाणी आणले जाणार असून, प्रकाश धारिवाल यांच्या आग्रहावरून या योजनेसाठी पाठपुरावा केल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. या योजनेचे काम सुरू झाले असून, येत्या आठ ते दहा महिन्यांत शहराच्या पाणीपुरवठा योजनेत पाणी येईल.
शहरातील लाटेआळी येथील शाळा इमारतीसाठी सव्वातीन कोटी, घनकचरा डेपो येथे शेड उभारणीसाठी दीड कोटी, दशक्रिया घाट नुतनीकरणासाठी एक कोटी, मुंबई बाजार ते अग्निशामक सेंटर रस्त्यासाठी 54 लाख, स्टेट बॅंक कॉलनीतील रस्त्यासाठी पन्नास लाख, जेंटिंग वाहनासाठी 35 लाख व हायड्रॉलिक शिडीसाठी 25 लाख, कुंभार आळीतील तालमीसाठी 25 लाख आणि मुस्लिम दफनभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी वीस लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
संसदरत्न मिरवत बसलो नाही
टाळ्या घेणारी भाषणे करून विकास होत नसतो, संसदरत्न किताब मलाही मिळाला होता. खासदार श्रीरंग बारणे यांना तर आठ वेळा मिळाला. पण, आम्ही तेच मिरवत बसलो नाही. हे लोकांच्या भावनांशी खेळणे आहे. अजितदादा बोलले ती वस्तुस्थिती आहे की हे नटांचे काम नाही. त्यामुळे राउंडवर येणारा नेता हवा की ग्राउंड फिरणारा, याचा विचार जनतेनेच करावा.
श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणीही करू नये
शिरूर शहरासाठी घोड धरणातून राबविण्यात येणार्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून 70 कोटींहून अधिकचा निधी मिळाला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे कुणीही या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.
शिरूर शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत असतो. वास्तविक हे मी कर्तव्य भावनेतून करीत असल्याने मी सगळ्या डगरीवर पाय ठेवून काम करीत असल्याचा गैरसमज पसरवला जाऊ नये. मी कुठल्याही राजकीय पक्षात नाही. त्यामुळे शहर विकासाच्या विषयांत कुणीही राजकारण आणू नये. -प्रकाश धारीवाल, माजी सभागृह नेते, शिरूर नगर परिषद