हिंजवडी, (वार्ताहर) – कासारसाई, नेरे, मारुंजी, माण, भोईरवाडी, घोटवडे आदी गावांना जोडणार्या डोंगराला आग लागून आगीत जंगली प्राण्यांसह गवत, झाडे व जलचर प्राणी जळून खाक झाले आहेत. या भीषण वणव्यामुळे डोंगरातील पशु, पक्षी, प्राणी सैर-भैर झाले आहेत. तर ही आग निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित असा प्रश्न स्थानिक नागरिकांना व निसर्गप्रेमींना पडला आहे.
गेले चार दिवस रात्रंदिवस हा वणवा डोंगरातील कुरण, वृक्षवल्लीच्या जाळ्याची तसेच निसर्ग संपत्तीची राख करत आहे. ही आग विझविण्यास कुणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे वनविभाग व निसर्गप्रेमी नेमके करतात काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. डोंगरावर वाढलेल्या गवताळ भागात काही पाळीव जनावरे चरत असल्याने परिसरातील काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय परिसरातील शेतकरी वर्गामधून व्यक्त केला जात आहे.
मागच्या आठवड्यातच डोंगरावर चरणार्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी काही समाजकंटकांनी शेतात गव्हाच्या पिठात गुंडाळून ठेवलेल्या गावठी बॉम्बमुळे एका गाईला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना पुन्हा डोंगराचा भाग आठ ते दहा ठिकाणी आगीच्या विळख्यात सापडल्याने ही आग मानवनिर्मित असल्याचा दावा अनेक शेतकर्यांनी केला आहे.
डोंगरावरील सुकलेला चारा खाऊन उन्हाळ्यात पाळीव जनावरे व मोकाट जनावरे डोंगरावरून खाली येऊन ओढ्याला पाणी पितात व शेतपिकांची नासाडी करतात. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी नेरे येथील डोंगरावरील आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाची एक गाडी बोलविण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अनेक शेतीचे बांधावर आग लागल्याने पिकांचे देखील नुकसान झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
कासारसाई, नेरे भागातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलात वन्यजीव, औषधी वनस्पती यांचा आधिवास आहे. परंतु वणवा लागल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. डोंगराला आग लावणारे समाजकंटक वन्य विभागाने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाइ करणे गरजेचे आहे. तसेच जंगलाला वणवा लागला तर तो आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडे सुसज्ज यंत्रणा असणे गरजेचे आहे. म्हणजे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.