काटशहाचा खेळ फक्त बुद्धिबळाच्या पटावरच खेळला जातो असे नव्हे तर राजकारणाच्या पटलावरही काळे-पांढरे वजीर हा खेळ खेळत असतात. भाजपला या खेळात आघाडीवर रहायचे आहे.
अठराव्या लोकसभेची निवडणूक आता जवळपास शंभरपेक्षाही कमी दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून आता कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. अशात, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह रालोआ आणि संपुआतील घटक पक्षांनी डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेदाचा अंगीकार केला असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. आपली ताकद वाढवायची आणि विरोधकांना शक्तिहीन करायचे हे धोरण स्वीकारले आहे आणि त्यात सत्ताधारी पक्षाला यश मिळतानाही दिसत आहे. अलीकडच्या काळातील राजकीय उलटफेर बघितले तर याची खात्री पटल्याशिवाय राहणार नाही.
भाजपला याची चांगली जाणीव आहे की कोणता डाव आधी खेळायचा जेणेकरून आपलाच डाव आपल्या अंगावर उलटणार नाही. कदाचित म्हणूनच भाजपने प्रभावी आणि दूरगामी विचार करीत राजकारणातील पहिला डाव खेळला तो बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इंडिया आघाडीतून फोडण्याचा. यानंतर राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पक्षात फूट पाडून जयंत चौधरी यांना अखिलेश यादव यांच्यापासून लांब केले आणि रालोआत सामील करून घेतले. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना भाजपात आणले आणि केवळ आणले नाही तर राज्यसभेतही पाठविले. बसपाच्या मायावती आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांना विरोधी पक्षात जाण्यापासून रोखण्यातही यश मिळविले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन तुकडे झाले आहेत. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. छिंदवाडाचे खासदार नकुलनाथ यांनी एक्सवरून काँग्रेसचे चिन्ह काढल्यामुळे पिता-पुत्र ‘कमळ’ हाती घेतील अशी चर्चा होती. मात्र यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या निशाण्यावर आता पश्चिम बंगाल आणि देशाची राजधानी दिल्ली आहे. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीच्या राजकारणात अंगदप्रमाणे पाय रोवून बसले आहेत. पश्चिम बंगालवरही भाजप डोळा ठेवूनच आहे. मात्र भाजपात गेलेले अनेक तृणमूल काँग्रेसी दीदीकडे परतले आहेत. या ठिकाणी महत्त्वाची एक बाब नमूद कराविशी वाटते ती अशी की, काँग्रेसचे कितीतरी नेते आतापर्यंत भाजपात दाखल झाले आहेत. परंतु, राहुल गांधी यांच्या चेहर्यावर साधी रेषसुद्धा बघायला मिळालेली नाही. ते ‘भारत जोडो न्याय यात्रेत’ पूर्णपणे मग्न आहेत. खरंतर पक्षाला लागलेली गळती बघून हताशा जाणवायला हवी होती.
इंडिया आघाडीला गळती लागली आहे, हे खरं असलं तरी लोकसभेची आगामी निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होईल असे दिसून येऊ लागले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा अर्धा टप्पा गाठला आहे. पुढील वीस दिवसांनंतर या यात्रेचे मुंबईत समापन होईल. राजकारण क्षणाक्षणाला नवीन रूप धारण करीत आहे. यामुळे योग्य वेळी योग्य डाव खेळण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. जे चांगले चालले आहे ते कसे खराब करायचे आणि जे वाईट चालले आहे ते कसे सुधारायचे हे माहीत असले पाहिजे, यालाच म्हणतात राजकारण.
बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे राजकारणातही कोणता घोडा मारायचा आणि कोणता उंट कोणत्या सैनिकाला मारायचा याची कला अवगत असायला हवी, जेणेकरून निवडणुकीचा अपेक्षित निकाल लावता येईल. यात भाजपचा हतखंडा आहे. भाजप राजकीय बुद्धिबळाच्या चाली खेळण्यात निपुण आहे आणि सत्ताधारी पक्षाची नजर नवीन राजकीय उलटफेर घडवून आणण्यावर टिकली आहे. भाजपच्या एका चालीनंतर विरोधक कोणती हालचाल करणार आणि भाजपच्या वजीरांना मारण्यासाठी विरोधी पक्ष कोणता डाव खेळणार याचा अंदाज सत्ताधारी पक्षाने बांधला आहे.
बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे राजकारणाच्या खेळातही घोडा अडीच घर पुढे आणि अडीच घर मागे सरकतो. राजकीय पक्षांनी हाच डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. सर्व विरोधी पक्ष आपापले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्माचे संकट आहे आणि भविष्यातील राजकीय सत्तेबाबत प्रमुख पक्षांची राजकीय निष्ठा पूर्णपणे धुळीस मिळताना दिसत आहे. सध्याचे राजकारण हे तत्त्वांवर आधारित राहिलेले नाही, आता विविध राजकीय पक्षांना एका मार्गाने पदे आणि सत्ता उपभोगायची आहे आणि समाजात आपले स्थान टिकवण्याची स्पर्धा सुरू आहे.
बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे राजकारणातही चेकमेट असते. बुद्धिबळाच्या खेळात घोड्याला खूप महत्त्व असते. हे घोडे आवश्यकतेनुसार अडीच घर चारही दिशांना जाऊ शकतात. भाजपने आपल्या कळपात अशा घोड्यांचा साठा करून ठेवला आहे. याचा वापर भाजप योग्यवेळी परिस्थितीनुसार करणार.
या खेळात मंत्री आणि वजीर हा सर्वात शक्तिशाली जवान आहे. कारण तो त्याच्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार पुढे, मागे, बाजूने, बाजूला जाऊ शकतो आणि अनेक घरांमध्ये जाऊ शकतो. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा योग्य उपयोग केला होता.