राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपप्रणित महायुतीत आधीच तीन मोठे पक्ष आले आहेत. शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्या बरोबरच आता राज ठाकरेंची मनसेही या युतीत सामील होण्याच्या चर्चा आज चांगल्याच रंगल्या.
भाजपचे एक ज्येष्ठ नेते अशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले. या चर्चेने विरोधकांच्या आघाडीच्या पोटात गोळा येण्याऐवजी महायुतीतील नेत्यांच्याच पोटात गोळा आला असण्याची शक्यता अधिक आहे. या युतीतील सदस्यांना सामावून घेताना भाजपच्या राज्यातील नेत्यांची चांगलीच दमछाक होणार हे अगदी सरळ आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मूळच्या भाजपच्या लोकांच्या संधी आता आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता निर्माण होणेही अगदी स्वाभाविक आहे. वास्तविक राज्यातील सध्याच्या सरकारकडे दोनशेपेक्षा अधिक आमदार आहेत. संपूर्ण राज्यावर संख्याबळाच्या आधारे महायुतीचाच बोलबाला आहे, असे असताना अशा नवनवीन पक्षांना महायुतीत घेण्याचे जर प्रयत्न सुरू असतील, तर या युतीत नजिकच्या काळात राजकीय संदोपसुंदी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते हे सांगायला कोणा राजकीय भाष्यकाराची गरज नाही.
लोकसभेच्या जागा वाटपातून होणार्या वादातून फार मोठी बंडखोरी होण्याची शक्यता नसते कारण लोकसभेचा मतदार संघ मोठा असतो तेथे बंडखेार म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवणे जिकिरीचे असते त्यामुळे त्या निवडणुकीत बंडखोरी होण्याचा धोका फारसा नसला तरी आयत्यावेळी महायुतीतील तिकीट नाकारलेले मातब्बर दुसर्या पक्षातून उमेदवारी मिळवण्याचा धोका कायम राहतोच. पण हाच विषय लोकसभेनंतर येणार्या विधानसभांच्या निवडणुकीत आणखी उग्र होऊ शकतो त्यावेळी खर्या अर्थाने या तथाकथित महायुतीची कसोटी लागणार आहे. महापालिका पातळीवरच्या निवडणुकांविषयी तर बोलण्याची सोयच उरली नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे एका अर्थाने हा एक मोठाच राजकीय विचका ठरणार आहे.
मुळात विषय असा आहे की राज्यात मोठे पाठबळ असताना अशी फोडाफोडी करून भाजपला अजून काय साधायचे आहे हे लक्षात येत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अजूनही मोठा धोका असल्याचीच ही लक्षणे मानली जात आहेत, त्यामुळे अजूनही काँग्रेस व अन्य पक्षाच्या नेत्यांना फोडणे आणि मनसे सारख्या पक्षांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रकार सुरू आहेत. पण त्याचा अंतिम परिणाम मात्र ही युती फुटण्यातच होईल हेही स्पष्ट आहे. या सगळ्या धांदलीत मूळ भाजपच्या निष्ठावानांना कोणी विचारणारा आहे की नाही, असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे.
काही जणांनी त्यासाठी उघड आवाज उठवणे सुरूही केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांना राज्यसभा निवडणुकीत पुन्हा डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या मनातील खदखद त्यांच्या चिरंजीवांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांचे एक निवेदन वृत्तपत्रांमध्ये अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. ही महायुतीच्या विचक्याची सुरुवात मानावी लागेल. मूळ भाजपच्या निष्ठावानांनी अशी उद्विग्नता व्यक्त करणे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण त्यांनी पक्षाला काहीही भवितव्य नसलेल्या काळापासून खस्ता खाल्ल्या आहेत. आता पक्षाला सुगीचे दिवस आल्यानंतर बाहेरून येणारेच पुन्हा सत्तेची पदे मिळवणार असतील, तर या सुगीचा आपल्याला उपयोग काय अशी प्रतिक्रिया त्यांच्या मनात निश्चित असणार.
अगदी परवाच्याच राज्यसभा निवडणुकीचे चित्र लक्षात घेतले तरी ही बाब चटकन लक्षात येईल. राज्यसभेच्या सहा जागांसाठी ही निवडणूक होती आणि ते सहाही जण बिनविरोध विजयी झाले आहेत. पण त्यातील चार जण मूळ काँग्रेसी आहेत. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचेच चंद्रकांत हंडोरे राज्यसभेवर गेले आहेत. महायुतीचे विधानसभेत दोनशेपेक्षा अधिक आमदार असताना भाजपवर बाहेरच्यांना सत्तापदे देण्याची वेळ येण्याचेच कारण नव्हते, अशी निष्ठावंतांची धारणा झाली असणार आणि त्यातून त्यांच्यात निर्माण झालेली खदखद नजिकच्या काळात केव्हाही बाहेर पडू शकते. त्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्रातील भाजप एका सुप्त ज्वालामुखीवर उभा आहे, असेही म्हणता येईल. ही स्थिती भाजप श्रेष्ठी का लक्षात घेत नसावेत हाही एक प्रश्न आहे. त्यात आता मनसेलाही बरोबर घ्यायच्या हालचाली सुरू झाल्या असतील तर सगळाच मामला आणखी बिकट होऊन बसणार आहे. ते जर बरोबर आलेच तर त्यांना काय देणार याचीही चर्चा सुरू होणार.
भाजपच्या विधानसभेत सर्वाधिक जागा असताना मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे नाही. मंत्रिपदाचा सर्वात मोठा वाटाही शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे गेलेला आहे. असे असताना भाजपचे आमदार किंवा अन्य इच्छुक आता आणखी किती कळ सोसणार हाही मुद्दा आहे. भाजपच्या वळचणीला जाऊन मनसेला फार राजकीय लाभ होण्याची शक्यता दिसत नाही. मनसे हा एक चांगला पक्ष वेळोवेळी घेतलेल्या चुकीच्या भूमिकांमुळे अस्तित्वहीन होण्याच्या वाटेवर आहे.
वास्तविक जेव्हा शिवसेना भाजपपासून दूर झाली त्याचवेळी मनसेने भाजपशी जुळवून घेतले असते तर ते फायद्यात राहिले असते आणि त्यांचा दबदबाही कायम राहिला असता, पण त्यावेळी राज ठाकरेंची मुलुख मैदानी तोफ मोदींवर टीका करण्यात व्यस्त राहिली. त्यामुळे त्यांची ही संधी हुकली. आता पुन्हा काही अडचणींमुळे त्यांना भाजपबरोबर जावे लागणार असेल तर त्यांच्या पदरात फार काही पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे अर्थातच पुन्हा चुकीच्या भूमिकेमुळे मनसे अडचणीत येणार हे स्पष्ट आहे. राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत, त्यामुळे त्यांना कोणातरी राजकीय जाणकारांचा सल्ला घेऊन पावले टाका असा सल्ला देणे निरर्थक आहे.
मनसेला लोकसभा किंवा विधानसभेला फार जागा देण्यापेक्षा त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत वापरून घेण्याचा भाजपचा डाव दिसतो आहे. पण महाराष्ट्रातील या मोठ्या प्रादेशिक पक्षाला एवढासा लाभ परवडेल काय याचाही विचार त्यांना करावा लागेल. या सगळ्या राजकीय खेळ्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होऊ लागला आहे. अगदी थेट भाषेत सांगायचे तर महाराष्ट्राचे राजकारण नासत चालले आहे आणि त्याला बहुतांशी भाजपच जबाबदार आहे.