महान गीतकार आणि कवी गुलजार यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कवितेने, शब्दांनी माझ्या आयुष्यातल्या लोखंडी क्षणांना परिसस्पर्श लाभला.
1988 सालची गोष्ट आहे. माझे स्नेही चित्रपट-दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. चित्रपटसृष्टीतल्या तार्यांची ये-जा चालू होती. आयुष्यात पहिल्यांदाच थिएटरचा पडदा सोडून सगळ्यांना पाहात होतो. नजरेत भांबावलेपण होतं. या चित्रतारकांच्या गर्दीत एका ठिकाणी शांतपणे गुलजार उभे होते. सगळेजण त्यांना नमस्कार करून पुढे जात होते. त्या गर्दीला दूर सारून गुलजारांना भेटलो. ‘मेरे अपने’ हा त्यांचा मला त्या काळात आवडलेला चित्रपट. त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. धीर एकवटून त्यांना म्हणालो, ‘तुमच्याशी खूप बोलायचे आहे. तुम्हाला भेटायला घरी केव्हा येऊ?’
ते लगेच म्हणाले, ‘उद्या सकाळी आठ वाजता.’ त्यांनी घराचा पत्ता समजावून सांगितला. सकाळी आठ वाजता बांद्य्राला पाली हिलच्या बोस्कीयाना बंगल्यात गेलो. त्यांच्या धीरगंभीर आवाजाने भारावून जात होतो. ते बोलत होते. मी ऐकत होतो. दोन तास उलटून गेले. त्यांचा निरोप घेताना त्यांनी मला त्यांची चार पुस्तके भेट दिली.
पहिल्याच भेटीत मिळालेला त्यांचा दोन तासांचा सहवास आणि चार पुस्तके यामुळे झालेल्या आनंदात मश्गुल होतो. दुसरे काहीच सुचत नव्हते. एका ऋणानुबंधाच्या नात्याला सुरुवात झाली. यानंतर भेटीचे योग येत राहिले…
पुढे डिसेंबर 2000 मध्ये नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता त्यांच्या घरी गेलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी म्हटले, ‘हे वर्ष संपले. पुढच्या वर्षी तू काय करणार आहेस?’
‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या संपादनाचे काम चालू आहे, पाच-सहा महिने यात निघून जातील.’
ते म्हणाले, ‘हे पुस्तक तूच प्रकाशित कर. पुस्तक चांगले होईल.’
प्रकाशन क्षेत्र वेगळे आहे. मला त्यात पडायचे नव्हते. त्यांना माझे विचार सांगितले.
ते म्हणाले, ‘मला काही बाकीचे माहीत नाही. हे पुस्तक तूच प्रकाशित कर. तुला काही अडचण असल्यास मला सांग.’ गुलजारांच्या आग्रहाखातर मीच पुस्तक प्रकाशित केले. पहिली प्रत त्यांना दिली तेव्हा ते म्हणाले, ‘तू बघ आता. पुढे काय होते ते!’
यानंतर या पुस्तकाच्या पंचविसाव्या आवृत्तीचे सेलिब्रेशन करत असताना ते मला म्हणाले, ‘तुला म्हणालो होतो ना! तूच पुस्तक प्रकाशित कर.’ मग हसत हसत म्हणाले, ‘कधी कधी आमचेही ऐकत जा.’
मनातल्या मनात पुटपुटलो, प्रतिभावान दिग्दर्शकानेे पहिला शॉट घेतला की, त्याला पुढचे सारे काही दिसू लागते आणि कवीला क्षितिजापल्याड दिसते. या दोन्ही गोष्टी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत ते गुलजार मला लाभले. बैठक संपता संपता पंचविसाव्या आवृत्तीवर त्यांनी लिहिले, ‘अरुण अब मै पास हो गया।’
यानंतर पुढच्या वर्षीची घटना. ‘देवडी’ कथासंग्रहाच्या प्रती नुकत्याच प्रकाशकाकडून आल्या होत्या. त्यातल्या एका प्रतीवर सही करून त्यांनी मला दिले आणि सांगितले, ‘हे पुस्तक तूच प्रकाशित कर. ‘ऋतुरंग’ प्रकाशनातर्फे पुस्तक प्रसिद्ध झालेले मला आवडेल.’
मी संकोचून गेलो. काहीच बोललो नाही. त्या निःशब्द शांततेचा भंग करीत ते म्हणाले, ‘या पुस्तकातून तुला नुकसान होणार असेल तर तू प्रकाशित करू नको.’
मी म्हणालो, ‘तसं नाही. तुमचं पुस्तक प्रकाशित करताना मनावर दडपण येतंय.’ ते म्हणाले, ‘प्रकाशित केल्यावर मला किती आनंद वाटेल याचा तू विचार केला आहेस का?’
त्यांच्या घरातून बाहेर पडलो. पुस्तकाच्या कामाला प्रारंभ केला. माझे आवडते लेखक अंबरीश मिश्र यांचा 24 डिसेंबर हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त ‘देवडी’ पुस्तक भेट पाठवले. या पुस्तकाचा अनुवाद अंबरीश यांनी केला आहे.
नसरीन मुन्नी कबीर यांचे गुलजारांवरचे पुस्तक 9 डिसेंबरला प्रकाशित झाले. मला कार्यक्रमाला जाता आले नाही. नेहमीप्रमाणे सकाळीच आठ वाजता त्यांना भेटलो. अंबरीशजींचा अनुवाद त्यांना आवडला. अनुवादाविषयीच बोलत होतो. चहा पिता पिता ते म्हणाले, ‘अरूण, माझी एक सवय आहे. तू कुठल्याही गोष्टीला नाही नाही म्हणतोस. आता ‘नाही’ म्हणायचं नाही. कागद-पेन घे. मी ‘देवडी’ची अर्पणपत्रिका सांगतो. तू लिहून घे. ते सांगत होते –
मेरी मराठी का ‘अ’ अरुण शेवतेसे शुरू होता है, यह किताब उसी के लिये
ते ऐकून मी निःशब्द आकाशात हरवून गेलो. असा निर्मळ मनाने प्रेम करणारा माणूस आयुष्यात लाभणे याला भाग्य लागते. मला हे भाग्य गुलजारांनी दिले. मनस्वी संवेदनशीलतेचे अनुभव दुर्मिळ असतात. मला तर अनेक दुर्मिळ अनुभव गुलजारांनी दिले. ‘देवडी’ प्रकाशित करताना आनंद वाटतो. ज्या माणसाच्या कवितेने, शब्दांनी आयुष्यातल्या लोखंडी क्षणांना परिसस्पर्श लाभला. त्याच्या ऋणात राहणेच चांगले. असा ऋणानुबंध आयुष्यात यावा लागतो. माझ्या आयुष्यात तो मला लाभला.
गुलजारांकडे शब्द सामर्थ्याचे एवढे मोठे वरदान आहे की त्यांच्या मोजक्या शब्दातून ते प्रसंग आणि माणसे अचूकपणे उभे करतात. जीवनातील साध्या साध्या प्रतिमांचे दर्शन मोठ्या अनोख्या पद्धतीने गुलजारांच्या कथांमधून आणि कवितांमधून होते. कारण ते जीवनाला अतिशय साधेपणाने सामोरे जातात. त्यांच्या कविता इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात, कारण कवितेला आवश्यक असणार्या भावना, शब्द सौंदर्य त्यामध्ये असतेच पण त्याही पलिकडे असणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवितेचा स्पर्श त्यामध्ये असतो. या स्पर्शातून वाचणार्याला अनुभूती मिळते आणि ती खूप महत्त्वाची आहे.
गुलजारांच्या लेखनाचे हेच मोठे सामर्थ्य आहे असे म्हणावे लागते.चित्रपट आणि गीत क्षेत्रातला मी जाणकार किंवा पंडित नकीच नाही. पण तरीही गुलजार यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व एक माणूस म्हणून, मैत्री म्हणून माझ्या आयुष्यात आले, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. त्यांच्याकडून मला माणूस म्हणून किंवा त्यांच्या मैत्रीतून जे लाभले ते लाभणे हा दुर्मिळ योग आहे. मी स्वतःला फार नशिबवान समजतो की त्यांचा सहवास, त्यांचे प्रेम मला लाभले.
एकदा एका खूप मोठ्या माणसाने मला गुलजारजींबाबत एक प्रश्न विचारला होता. ते मला म्हणाले होते की, तुम्ही ज्यावेळी गुलजारजींना भेटता तेव्हा ऊर्दूतून बोलता, इंग्रजीतून बोलता की मराठीतून बोलता? त्या माणसाला मी उत्तर दिले होते की, जो माणूस मुक्या आणि बहिर्या व्यक्तींवर ‘कोशीश’सारखा सर्वस्पर्शी चित्रपट बनवतो त्या माणसाशी संवाद साधताना भाषा ही महत्त्वाची ठरतच नाही. मी त्यांच्याशी बोलतो ते माणूस म्हणूनच बोलतो आणि माणुसकीची तीच भाषा बोलतो. इतर कुठल्याही भाषेपेक्षा ती सर्वाधिक श्रेष्ठ असते.
‘ज्ञानपीठ’सारखा साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.