श्रीनगर – केंद्र सरकारने आपल्याच देशातील नागरिकांवर पोलादी पंजा उगारला, पण त्यांनी चिनी सैनिकांचे मात्र स्वागत केले, अशा शब्दात पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशात लखीमपुरखेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या संबंधात त्यांनी ही टीका केली आहे. सरकारने प्रत्येक ठिकाणी कलम 144 पुकारून मानवी हक्कांची पायमल्ली केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. जम्मू काश्मीराच्या जनतेवरही सन 2019 पासून केंद्र सरकारची अशीच एकतर्फी दडपशाही सुरू आहे.
जे जम्मू काश्मीरच्या जनतेला भोगावे लागले आहे, तेच आता संपूर्ण देशातील जनतेला भोगावे लागत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. या साऱ्या दडपशाहीच्या विरोधात आपण कधी आवाज उठवणार आहोत, असा सवालही त्यांनी ट्विटरवर केला आहे.
लखीमपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, आता उत्तर प्रदेश हे राज्य दुसरे जम्मू काश्मीर बनले आहे.