मुंबई – केंद्र सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. परमवीरसिंह यांच्या विरोधात मुंबई आणि ठाणे परिसरात खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे त्यांना याच महिन्यात निलंबीत करण्यात आले आहे.
त्यांच्यावर आता केंद्र सरकारनेही शिस्तभंगाची कारवाई सुरू केली असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी एका लेखी उत्तरात दिली. ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल अंतर्गत ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील एकूण 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या शिफारशी राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत त्यावर अजून निर्णय झालेला नाही अशी माहितीही मंत्र्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. 30 अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात पाच पोलिस उपायुक्त, आणि पाच सहायक पोलिस आयुक्तांचाही समावेश आहे.
त्यांच्यावरील आरोपांविषयी राज्य सरकारने पोलिस महासंचालकांकडून अधिक तपशील मागवला आहे असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. या 30 अधिकाऱ्यांपैकी परमवीरसिंह आणि पराग मनरे यांना निलंबीत करण्यात आले आहे.