आमदार आशुतोष काळे यांची मागणी; तिसरा हप्ता प्रति मे. टन 50 रुपये देणार । कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत
कोपरगाव – कारखान्याला तोटा झाला तरी चालेल मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे, ही कर्मवीर शंकरराव काळे यांची विचारसरणी होती. ती विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून कारखान्याने नेहमीच उसाला जिल्ह्यात एफआरपीपेक्षा जास्त दर दिलेला आहे. ही परंपरा कायम ठेवून तिसरा हप्ता प्रती मे.टन 50 रुपये देऊन (एकूण दर 2650) व 2010-11 मध्ये कपात केलेली पूर्व हंगामी प्रती. मे.टन 50 रुपये ठेव देखील देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे. तसेच केंद्र शासनाने आयकराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून सहकारी साखर कारखानदारी वाचवावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संचालक, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. या प्रसंगी ते बोलत होते.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, 2021-22 मध्ये ब्राझिलचे साखर उत्पादन घटल्याने भारतीय साखरेला परदेशात मागणी वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे साखरेचे दर देखील वाढले. त्यामुळे केंद्र शासनाने साखर निर्यातीस कोणतेही अनुदान न देता देखील आजपर्यंत जवळपास 110 लाख मे.टन साखर देशातून निर्यात झाली आहे. काळे कारखान्याने 2 लाख 84 हजार क्विंटल कच्ची साखर निर्यात करून साखर साठा कमी कसा राहील व साखरेच्या मालतारणाच्या कर्जाचे व्याज कमी होऊन कारखान्याचे आर्थिक हित साधले असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना आधुनिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. 2022-23 चा गळीत हंगाम नवीन मिल व नवीन बॉयलर घेणार असून दुसऱ्या टप्प्यात नवीन बॉयलिंग हाऊसचे काम लवकरच सुरू होईल.
मागील गळीत हंगामात विक्रमी ऊस उत्पादन झाल्यामुळे सर्वच कारखान्यांचे ऊस उपलब्धतेचे अंदाज चुकले. त्यामुळे गाळप हंगाम लांबला. यापुढील काळात देखील कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त ऊस केन हार्वेस्टरने तोडण्याचे कारखान्याचे नियोजन आहे. 2021-22 च्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा 3.40 कोटी झाला असून 31 मार्च 2022 अखेर एकूण संचित नफा 21.11 कोटी झाला असून, कारखान्यास ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
जास्तीत- जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले. . यावेळी विषय पत्रिकेवरील 1 ते 13 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. आभार व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी मानले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीप बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब कदम, विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, एम. टी, रोहमारे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, वसंतराव दंडवते,आनंदराव चव्हाण, संभाजीराव काळे, नारायण मांजरे, धरमचंद बागरेचा, गोरक्षनाथ जामदार, ऍड.आर.टी.भवर, ऍड. एस.डी. औताडे, सर्व संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे आदींसह कारखान्याचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम वाया जाऊन शेतकरी अडचणीत आले आहेत. पिकांचे पंचनामे चालू आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील पूर, अतिवृष्टी, करोना संकट अशी संकटे आलीत मात्र त्या काळात महाविकास आघाडी सरकारने या संकटांचा समर्थपणे सामना करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली आहे. आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असून सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
आशुतोष काळे, आमदार