जयपुर – केंद्र सरकारने इंधनावर अलीकडेच जे उत्पादन शुल्क कमी केले आहे, ती अत्यंत तोकडी उपाययोजना असून केंद्राने हे उत्पादन शुल्क आणखी कमी केले पाहिजे, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्र पाठवून केली आहे.
केंद्राने सर्व पेट्रोलियम कंपन्यांना इंधनाची दरवाढ ताबडतोब थांबवण्याचे आदेश द्यावेत म्हणजे कमी झालेल्या उत्पादन शुल्काचा जनतेला लाभ घेता येईल, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रूपये तर डिझेल वरील उत्पादन शुल्कात दहा रूपये इतकी घट केली होती. केंद्राने पेट्रोल वर आणखी 10 रुपये आणि डीझेल वर 15 रुपयांची कपात करावी.
केंद्राने हे उत्पादन शुल्क कमी केले तर राज्यांचा व्हॅटही त्या प्रमाणात आपोआप कमी होऊन लोकांना त्याचा लाभ होईल, असेही गहलोत यांनी या पत्रात नमूद केले आहे. केंद्र सरकारकडून जे उत्पादन शुल्क जाहीर केले जाते त्यातील राज्यांचा वाटा केंद्राने कमी केला आहे ही बाबही त्यांनी निदर्शनाला आणून दिली आहे.