मुंबई – केंद्र सरकारने काल महाराष्ट्रातील जैतापूर अणुप्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय केंद्र सरकार कोणताही प्रकल्प राबवू शकत नाही.
काल पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात म्हटले आहे की, जैतापूर येथील अणुप्रकल्पाच्या सहा पॉवर रिऑक्टर्सना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यातून 1650 मेगावॅट वीज निर्माण होईल. फ्रान्सच्या मदतीने हा अणुऊर्जा प्रकल्प राबवला जात आहे.
तथापि, या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय केंद्र सरकारला हा प्रकल्प राबवता येणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे. या संबंधात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्तेनवाब मलिक यांनी म्हटले आहे की, यूपीए सरकारने हा प्रकल्प आणला होता. पण त्यावेळी त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारने त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली होती.
संबंधितांची मान्यता घेतल्याशिवाय एखादा निर्णय घेतला तर तो कसा अंगलट येऊ शकतो हे आपण कृषी कायद्यांच्या संबंधात अनुभवले आहे, असे मलिक यांनी नमूद केले. हा प्रकल्प कोकण विभागासाठी अत्यंत घातक आहे अशी स्थानिकांची भावना आहे, असे कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही पूर्णपणे स्थानिकांच्या बाजूने आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.