पवन मावळ, {रवी ठाकर} – राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा महिनाभर आधीच बंद होणार आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील ऊसतोडणी कामगार होळीचा सण आपल्या गावाकडच्या घरी साजरा करतील. मात्र, दुष्काळी परिस्थितीत पुढील हंगामापर्यंत या कष्टकऱ्यांसमोर रोजीरोटीसाठी कामाची शोधाशोध करण्याचे आव्हान कायम असणार आहे.
मावळ तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले असून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी ऊसाचे पीक घेतात. कारखान्याच्या गळीत हंगामात राज्याच्या विविध भागातून ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने मावळमध्ये येतात. हजारो कामगार कुटुंबासह ऊस तोडणीचे काम करतात. यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम दिवाळीनंतर सुरु झाला. दिवाळी तोंडावर असतानाच कष्टकरी आपल्या कुटुंबासह कारखाना स्थळावर कासारसाई येथील वस्तीवर पोचले होते. यावर्षी ऊस टंचाई अभावी अनेक कामगारांना जेमतेम चार महिनेच काम मिळाले. काही ठिकाणी कामगारांना पाच महिने ऊस तोडणीचे काम मिळेल.
काही कामगार जून ते सप्टेंबर या कालावधीत गावी शेती व शेतमजुरी करतात. या काळात ते मुकादमाकडून आगामी कामापोटी उचल घेत असतात. सहा महिने ऊसतोड व सहा महिने गावी शेती व इतर मिळेल ते काम असे साधारण ऊसतोडणी कामगारांचे नियोजन असते. यावर्षी कारखान्यांना दुष्काळाअभावी उसाची टंचाई भासत आहे. त्यामुळे कारखाने आत्तापासूनच बंद होऊ लागले आहेत.
बैलांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो
मावळ तालुक्यात ऊसतोडीसाठी येणारे बहुतांश कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने ऊसतोडणीचे काम करतात. यातील अनेक जण बैल व बैलगाडीही सोबत आणतात. यामुळे तोडणीसह बैलगाडीने ऊस वाहून नेण्याचा मोबदलाही मिळतो. शिवाय, पाच ते सहा महिने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटतो.
उसाअभावी कारखान्यांचा हंगाम यंदा एक महिना आधीच संपेल. त्यामुळे बहुसंख्य कामगार १५ ते २० मार्चच्या दरम्यान गावी परततील. मावळ तालुक्यात आलेले हजारो ऊसतोड कामगार पारंपरिक ऊसतोड करतात. गावी परतल्यावर कामगार शेती, मजुरी, हंगामी लहान व्यवसाय आदी मिळेल ती कामे करतात.- विजय सांगळे, ऊसतोडणी मुकादम