फलटण (प्रतिनिधी) – आमची दिवाळी कडू करून, तुमची दिवाळी गोड होणार, हे आम्हाला मान्य नाही. गेल्या गळीत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये न देता, 100 रुपये दिल्याने, आम्हाला फक्त चटणी-भाकरी मिळेल. त्यामुळे तुम्हीही चटणी, भाकर खाऊन दिवाळी गोड करा आणि नवीन दर जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. फलटण तालुक्यातील श्री दत्त इंडिया, स्वराज, शरयू आणि श्रीराम-जवाहर या साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना संघटनेच्यावतीने सोमवारी निवेदन आणि खर्डा-भाकरी भेट देण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ऊस दर आंदोलन सुरू आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या राजव्यापी ऊस परिषदेतील मागणीनुसार, गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये मिळावा आणि चालू वर्षी गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन 3500 रुपये ऊसदर शेतकऱ्यांना एकरकमी मिळावा, यासाठी साखर कारखानदारांना निवेदन आणि खर्डा-भाकरीची दिवाळी भेट देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची ऊसदराची मागणी पूर्ण न झाल्यास, साखर कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करणार आहे. त्यातून होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी फलटण तालुक्यातील साखर कारखानदारांना दिला आहे.
यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, किरण भोसले, बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, धनंजय जाधव, अजित भोसले, केतन जाडकर, सागर जावळे आणि शेतकरी उपस्थित होते.