वीसगाव खोरे (वार्ताहर) – भारतासारख्या कृषि प्रधान देशात गेली हजारो वर्षे शेती ही पारंपरिक पध्दतीने केली जात असे. शेती करण्याकरीता बैल हा प्राणी महत्वाचा आहें, बैलाचा खुराक,त्याची देखभाल शेतकरी जीवापाड करत असतो. बैलांची देखभाल करताना बैलांच्या खुरांची निगा राखली जाई.
बैलांना शेतीतील सर्व कामे करावी लागतात त्यामुळे बैलांची खुराची झीज मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी वर्षातून दोन वेळा बैलांच्या खुरांना पत्री लावत जेणे करून बैलाच्या खुरांची झीज कमी होई. मात्र, आता ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांचा वापर जास्त व्हायला लागल्याने बैलांच्या खुरांना पत्र लावण्याचा व्यवसाय नामशेष होऊ लागला आहे.
२१ शतकात शेती क्षेत्रात आधुनिक यांत्रिकीकरणाने ट्रॅक्टरसारख्या साधनांनी कमी वेळेत, कमी खर्चात, कमी श्रमात शेतीची कामे होऊ लागली. बैल ह्या प्राण्याचे महत्व कमी झाले. त्यामुळे ग्रामीण भागात सर्रास बैलांना पत्री लावताना दिसणारे दृश्य नाहीसे होत आहे.
शासनाने मदत करावी…
आमचा बैलांना पत्री लावणे हा व्यवसाय नामशेष झाला आहे.पिढ्यांनपिढ्या चालणाऱ्या व्यवसायावर आमची गुजराण चालत असे आता शेतकऱ्यांकडे आता बैलजोडी राहिली नाही. ग्रामीण भागात बैलांचे प्रमाण फारच कमी झाले आहे.
पूर्वी सतत काम असे, आता महिन्यात एखादे काम मिळते. आमच्यासारख्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना शासनानी मदत करावी, अशी व्यथा उत्रौली.(ता.भोर) येथे ८३ नालबंद कारागीर फारुख नालबंद यांनी मांडली.