थेऊर (वार्ताहर) – पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते लोणी काळभोर पर्यंत रस्त्याची डागडुजी ठराविक ठिकाणी सुरू आहे. थेऊर फाटा व लोणीकाळभोर येथील बोरकर वस्ती येथील ओढ्यावरील पुलाचे कठडे तसेच सोरतापवाडी हद्दीतील वाकड्या पुलावरील सरंक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे.
याकडे प्रशासनाने पद्धतशीरपणे काणाडोळा केला आहे. त्यातच पुणे-सोलापूर महामार्गाला काही ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत असल्याने हा महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे.
पूर्व हवेलीतील सोरतापवाडी हद्दीतील वाकड्या पुलावरील संरक्षक कठडा तुटल्याने वाहनांसाठी हा एकप्रकारे मृत्यूचा सापळाच बनला आहे. उरुळी कांचनकडून हडपसरच्या बाजूकडे जाताना वाकड्या पुलावर डाव्या बाजूला संरक्षक कठडा नसल्यामुळे त्यावरून प्रवास करणारे वाहने थेट त्या ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या 50 ते 60 फूट कोसळून मोठा अपघात घडण्यासाठी एकप्रकारे आमंत्रणच दिले जात आहे.
याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक मालवाहू ट्रक कठडा तोडून थेट ओढ्यात कोसळल्याची घटना घडली होती. याबद्दल माहिती असतानाही प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर रंगरंगोटी, रस्त्याचे दुरुस्तीचे काम काही ठिकाणी सुरु आहे. मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कडून (एनएचएआय) एवढ्या मोठ्या व गंभीर बाबीकडे कुठल्याही अधिकार्यांचे लक्ष गेले नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग कोंडीचा
शेवाळेवाडी, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, लोणी कार्नर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी चौक, उरुळीकांचन याठिकाणी कायमच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वाढत्या नागरिकीकरणांमुळे येथील रहदारीचा प्रश्न जटील बनला आहे. त्यामुळेपुणे-सोलापूर महामार्गावर वरील ठिकाणी वाहतूकीची कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी बनली असून यामधून मार्ग काढण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
महत्त्वाच्या रस्त्यावरील पुलावर कठडा नसणे हे अत्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर आहे. प्रशासनाने त्वरित संरक्षक कठडा बसवावा. यामुळे मोठा अपघात व जीवितहानी टाळू शकेल. तरी संबंधित विभागाने त्वरित त्या ठिकाणी कठडा बसवावा.- अशोक चौधरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, सोरतापवाडी