मुंबई: आज विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना खूश करणारा आहे. ओबीसी समाजासाठी देखील विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ म्हणाले, कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी बेरोजगार तरूणांवर ६ हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. सोबत पर्यटन क्षेत्राला पहिल्यादांच मोठा निधी देण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्यातील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शाळा-महाविद्यालये सुधारण्यात येणार आहेत.
राज्यातील जलसंवर्धनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला ११ हजार कोटी देण्यात आले आहेत. वीज दर वाढीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान व्हायचे. त्याच पार्श्वभूमीवर ५ लाख सौर उर्जेवर चालणारे पंप तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठी यावर्षी २ हजार ६२० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे भुजबळ म्हणाले.
तसेच पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी देण्यात आले. थोडक्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमार्फत सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडून राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम अजित पवारांनी केलं आहे. हा अर्थसंकल्प केवळ एका विभागाचा नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी मांडण्यात आला आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.