मुंबई – न्यूझीलंडच्या दौऱ्यावरून परतलेला भारतीय संघ येत्या 12 तारखेपासून भारतातच दक्षिण आफ्रिकेशी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सहभागी होत आहे. या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले असून सलामीवीर लोकेश राहुल याच्याकडे संघाचे नेतृत्वा सोपविले जाणार आहे.
कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्मा नेतृत्व करतो. मात्र, तोदेखील अद्याप दुखापतीतून सावरलेला नसल्याने राहुलकडेच नेतृत्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने मालिका विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही मालिकेत कोहलीला अपयश आले होते. सातत्याने सामने खेळायला लागत असल्याची टीकाही त्याने केली होती. मंडळाने कोहलीला विश्रांती मिळावी यासाठीच राहुलचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेस येत्या गुरुवारी होत असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहितला दुखापत झाली होती त्यामुळे त्याने एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेतून दुखापतीतून सावरण्यासाठी माघार घेतली होती.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहित सध्या सराव करत असला तरी तो पूर्ण तंदुरुस्त कधी होईल याबाबत अकादमीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोहलीसह तोदेखील या मालिकेत सहभागी होऊ शकत नसल्याने मंडळाने राहुलचा पर्याय तयार ठेवला आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त झाल्याने तसेच सलामीवीर शिखर धवन देखील संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याने भारतीय संघाची फलंदाजी बळकट बनली आहे.