भोपाळ – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे खरे शेतकरी नाहीत. ते दलाल आहेत, असा दावा मध्यप्रदेशचे कृषी मंत्री आणि भाजप नेते कमल पटेल यांनी बुधवारी केला.
दलाल अतिशय कमी किमतीत शेतमालाची खरेदी करून दहापट अधिक दराने विकतात. मात्र, नव्या केंद्रीय कृषी फायद्यांमुळे दलालांना फटका बसणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना देणग्या देणारे ते दलाल आंदोलन करून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत. ते कायदे शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळवून देणार आहेत.
दलालांना टाळून शेतमाल विकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी भूमिका पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली.
आंदोलन म्हणजे विरोधकांचे कारस्थान – पाटील
भाजपचे आणखी एक नेते आणि त्या पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी शेतकरी आंदोलन म्हणजे विरोधी पक्षांचे पूर्वनियोजित कारस्थान असल्याचा आरोप केला. विरोधकांनी जनाधार गमावला आहे.
त्यामुळे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार ते घडू देणार नाही, असे ते सुरतमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.