नेत्यांना सवाल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रश्नांचा धुमाकूळ
सातारा – घर फिरले की घराचे वासे फिरतात, ही म्हण आज महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनुभवायला मिळत आहे. भाजपला अच्छे दिन असल्याने व परत तोच पक्ष सत्तेत येणार असल्याने राज्यासह सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणामुळे आता भाजप सत्तेपासून लांब जात राहिल्याने पक्षांतर करून गेलेले नेते आता मतदारसंघाचा विकास कसा करणार, असा सवाल विचारला जात आहे. या नेतेमंडळीना ट्रोल करणाऱ्या अनेक प्रश्नांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक लागल्यावर भाजप पुन्हा सत्तेत येणार, असे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, अशी अटकळ बांधत भाजपच्या नेत्यांनी राज्यात मेगा भरती राबवली होती. अर्थात ही भाजपसाठी भरती असली तरी याला सत्तेचा गैरवापर करून कारखानदार, सुतगिरणीवाले नेते भाजप फोडत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. सातारा जिल्ह्यातून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे कॉंग्रेस आमदार जयकुमार गोरे, वाईचे कॉंग्रेस नेते मदन भोसले, कराड उत्तरचे कॉंग्रेस नेते धैर्यशील कदम, विधानपरिषदेचे आमदार आनंदराव पाटील या नेत्यांनी सत्तेच्या डोहात उडी घेतली. यावेळी यातील प्रत्येक नेत्याने मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये दाखल होत असल्याचे मतदारांना पटवले होते. दरम्यानच्या काळात विधासभेची निवडणूक लागली.
प्रचाराचा धुरळा उडायला लागला, त्यावेळी यातील अनेकांना मंत्री करण्याचा शब्द तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते. तर नेतेमंडळींच्या मनात मंत्रिपदाचे लाडू फुटले होते. निवडणूक झाली, निकाल लागले अन् महाराष्ट्रात सत्तेचे घोंगडे कधी “मातोश्री’वर तर कधी “वर्षा’वर भिजत पडले. तरीही सरकार युतीचेच येणार, असे देवेंद्र फडणवीस सांगत असल्याने भाजप आमदारांना हायसे वाटत होते.
मात्र, रविवारी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला हादरा देणारी घटना घडली अन् कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये गेलेल्यांची मोठी गोची झाली. नेमके याच स्थितीत नेटकऱ्यांनी आपल्या टीकाटिपणींनी सोशलमीडियावर धुमाकूळ सुरू केला. “पवारांचे राजकारण संपवायला गेले अन् स्वत:च घरी गेले,’ “पवारांना दगा देणाऱ्यांनो आता कसं वाटतय?,’ यासह भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून हे सगळे विकासासाठी भाजपमध्ये गेले होते. यांना आता कुणी हसायचे नाही, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर पाठवत पक्षांतर केलेल्या नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे.